पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/269

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्यांत चाबकाच्या माऱ्यामुळे लैंगिक कोंडमारा कमी होतो असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते. नरसोबाच्या वाडीच्या उपचारामागे कदाचित असेही काही शास्त्र असू शकेल.
 येरवाडीच्या दर्ग्यात मिन्नत मागण्यासाठी हजारोंनी गर्दी उसळते. सगळ्यांना तातडीने दर्शन शक्य नाही, काही दिवस मुक्काम करावा तरच नंबर लागतो. साहजिकच, तेथे वेडे आणि त्यांचे नातेवाईक यांच्या निवासाची सोय करण्याचा मोठा व्यवसाय तयार झाला. नातेवाईक खोल्यांत राहतात, वेड्यांची सोय वेगळी – गोठ्यांत, तबेल्यांत. नातेवाईक म्हणजे कामाची माणसे, ती नंबर लागेपर्यंत कशी काय थांबणार? एकदोन दिवसांत ती आपल्या कामी लागतात; वेड्यांना दर्यात नेऊन आणण्याची जवाबदारी, तीर्थक्षेत्रांतील भिक्षुकांप्रमाणे, वेड्यांच्या आसऱ्यांचे व्यवस्थापक घेतात. एकेका कोठीत शंभर शंभर वेडे ठेवतात. त्यांच्या खाण्यापिण्याची, शौचमार्जनाची व्यवस्था कोण करतो? हे पळून गेले नाही म्हणजे पुरे. तेवढ्यासाठी आणि त्यांनी दंगाधोपा करू नये म्हणून त्यांना साखळीने बांधून ठेवले जाते.
 शर्यतींच्या घोड्यांवर चाबकाचा प्रयोग होऊ नये असा फतवा निघाला त्याच्या तिसऱ्याच दिवशी येरवाडीतील वेड्यांच्या एका गोठ्याला आग लागली. साखळीने बांधलेले वेडे जागच्या जागी होरपळून मेले. येरवाडीत असे पाचपन्नास गोठे आहेत. साऱ्या देशभरात असे 'दर्गे' किती, 'वाड्या' किती आणि गोठे किती असतील याची खानेसुमारीच नाही.
 म्हाताऱ्या आईबापांना पोसता येत नाही म्हणून त्यांना उघड्या डोळ्यांनी काशीमरणाला पाठवावे, बोजा होतो म्हणून मनोरुग्णांना जनावरांसारखे बांधून घालावे हे ज्या देशात होते तेथेच घोडे आणि कुत्रे यांचे कौतुक मानवतावाद आणि भूतदया म्हणून वाखाणले जाते. धिस् हॅपन्स ओन्ली इन इंडिया!

दि. १८/८/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन । २७१