पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/268

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हवेच्या चाबकाने घोडा दौडवता येईल असा विश्वास वाटेना. कोट्यवधींच्या शर्यतींच्या धंद्यात मोठा आकांत उडाला. परदेशांतील रेसिंग व्यवसायातही या करुणेच्या भावनेने अनेकांची मने हलली.
 मनेकाबाईंनी शेतकरी शेतात नांगर चालवताना किंवा बैलगाडी हाकताना पाहिला नसावा. चाबूकच काय, अणकुचीदार पराणीचाही प्रयोग सर्रास केला जातो. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना बैलांवर चाबकाचा प्रयोग करू नये असा फतवा निघाला तर मोठी कठीण अवस्था येणार आहे. बैल न वापरता ट्रॅक्टरच वापरायचे म्हटले तर तेथेही अडचण! कारण शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे पर्यावरणात प्रदूषण माजते; पण पोटच्या पोरांना दाटावे, आईमाईवरून शिव्या घालाव्या या संस्कृतीत बैलाच्या पाठीवरील चाबकाचे फटकारे कोणाला फारसे रुतत नाहीत.
 योगायोग असा, की ज्या आठवड्यात मनेकाबाईंनी हवेच्या चाबकाचा फतवा काढला त्याच आठवड्यात तामिळनाडूमधील येरवाडीचे जळीत प्रकरण झाले. येरवाडी येथे एक दर्गा आहे. या दर्यात मिन्नत मागितल्याने अगदी ठार वेडेसुद्धा बरे होतात अशी पूर्वापारची श्रद्धा आहे. हिंदुस्थानात मानसिक रुग्णांच्या उपचारांची सोय जवळजवळ नाही. मनाचे संतुलन गेलेली माणसे आजारी आहेत असे कोणाला वाटतच नाही. तिन्ही त्रिकाळ चाऱ्ही ठाव हादडणारा माणूस आजारी असेलच कसा, अशीच सरसकट भावना आहे. कुटुंबातून त्याला काढून लावण्याचे अनेक मार्ग आहेत. गर्दीच्या ठिकाणी, यात्रेत त्यांना गुपचूप सोडून देतात. वेडेचार करीत, कोणी पोटाला घातले तर ते खात जगता येईल तितके दिवस ते जगतात. हाल हाल होतात. वेडे माणूस बाई असली म्हणजे मग तर काय अनन्वित छळ होत असेल याची कल्पनाही कठीण. यातील काही माणसे चमत्कारिक योगायोगांमुळे अवलिया मानले जातात आणि भक्तीचा विषयही बनतात.

 महाराष्ट्रात नरसोबाच्या वाडीला देवळात वेड्यांचा उपचार होतो म्हणजे खांबाला बांधून त्यांना निर्दयपणे झोडपले जाते. प्रत्यक्ष रुग्णांना या उपचारांचा किती उपयोग होतो ते सांगणे कठीण आहे. त्यात अनेकांचे प्राणही जातात; पण कोणी थोडेफार वेडेचाळे करू लागला तर नरसोबाच्या वाडीला नेण्याच्या धमकीने, कदाचित, तो आटोक्यात राहत असेल तेवढाच काय तो या उपचाराचा उपयोग.
 मनोरुग्णांतील अनेक लैगिक कोंडमारीत असतात. कामविश्वात चाबकाचे दैवत करणारे समाज अनेक पाश्चिमात्य देशांत भरपूर पसरले आहेत. त्यांच्या

अन्वयार्थ – दोन । २७०