पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/266

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






धिस् हॅपन्स् ओन्ली इन इंडिया!


 नेका गांधी कोणत्या ना कोणत्या विचाराने भारून गेलेल्या असतात. पर्यावरण खात्याच्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःची अशी एक प्रतिमा बनवली. प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने अनेक कारखान्यांवर टाच आणली. एखाददुसरा कारखाना प्रदूषण नियमांचा भंग केल्याबद्दल बंदही करावा लागला असेल. पण, बहुतेक प्रकरणे सामोपचाराने मिटलेली दिसतात.
 प्राणिदया हा, सध्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याच्या केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या मनेका गांधींचा विशेष आवडीचा विषय. प्राणिजीवनावर त्यांनी अभ्यासपूर्वक बरीच पुस्तके लिहिली आहेत. शाकाहाराचा त्या आग्रह धरू लागल्या आहेत. मध्यंतरी, 'दूध हे रक्तच असते' असे म्हणून त्यांनी दूध पिण्यावर आक्षेप घेतला होता.
 शेतकरी गोठ्यातील जनावरांना आणि वाडीवर राहणाऱ्या कुत्र्यामांजरांनाही जीव लावतात. पशुपालन म्हटले, की त्यात काही क्रूरता अपरिहार्य असते. दुभती जनावरे म्हातारी झाली म्हणजे त्यांना काढून टाकताना शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबात मोठी उदासीनता येते; सुतकाची कळा येते. कालपर्यंत आपल्या गोठ्यात असलेले मुके जनावर आज कोठे चालले असेल, त्याचे काय होत असेल या कल्पनेनेही शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या पोटात गलबलून जाते.
 मनेकाबाईंनी, कसाईखान्याकडे जाणारी जनावरे मैलच्या मैल चालवत नेली जातात याबद्दल तक्रार केली; शेतकरी मनाला ती पटली. जनावर कापण्यापूर्वी आणि कापताना त्याचे विनाकारण हाल करू नयेत अशी त्यांची भावना.

 दुधाचा धंदा करायचा म्हणजे त्यात संवर्धन आले, पालन आले आणि त्याबरोबर भाकड जनावरे काढून टाकणेही आले. घरातील चालतीबोलती माणसे जड होऊ लागली म्हणजे मनावर दगड ठेवून शेतकरी मुलगा त्यांना वारीसाठी

अन्वयार्थ - दोन / २६८