पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/242

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डिश चालू नाही हा काही आजचा प्रकार नाही; निदान दोनचार महिनेतरी इंटरनेट बंद असणार.
 दुसऱ्या केंद्रावर गेलो. तेथे डिश नव्हती, टेलिफोनच्या तारेवर इंटरनेट चालवायचे होते; पण टेलिफोनही बंदच, टेलिफोनच्या तारांची ही सदाच अशी अवस्था.', उद्धारक म्हणाले. पहाता पहाता एका केंद्रावर भगीरथ प्रयत्नांनी उघडल्या गेलेल्या इंटरनेटवर आलेली माहिती पाहिली. बाजारपेठेचे भाव तीन दिवसांचे जुने होते. 'ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे,' महात्मा म्हणाले, 'सध्या ही माहिती टेलिफोनवरून घेतो आणि इथेच भरून टाकतो, आता पुढे बोलण्यात काहीच अर्थ राहिला नव्हता.
 परतीच्या वाटेवर महात्म्याने आपण केवढे त्याग करून, पैसा खर्चुन, झीज सोसून हे काम केले याचे वर्णन केले. 'थोड्या अडचणी आहेत; कोणत्याही कामात सुरुवातीला अडचणी असणारच. तेवढ्या किरकोळ दोन-तीन बाबी नीट केल्या की आमच्या प्रयोगाने मोठा चमत्कारच घडणार आहे! पहालच तुम्ही!' महात्मा पुढे म्हणाले, 'तुमच्या मंत्रालयाच्या NGOच्या यादीत तेवढे आमच्या संस्थेचे नाव घालून टाका म्हणजे काम करण्यास आम्हाला मोठा उत्साह वाटेल.'
 कोण्या एके काळी गांधीजींच्या शब्दाखातर गावांत जाऊन, अत्यंत साधी रहाणी ठेवून जमेल तितकी गावाची सेवा गाजावाजा न करता आयुष्यभर केलेली एक पिढी होऊन गेली तिचे हे वारसदार! काही लोकांना उद्धारकत्वाची चटक लागते; त्यांच्या हातून उद्धार करून घेण्याची कोणाला गरज वाटते किंवा नाही, उद्धाराच्या कार्यातून कोणाचे काही भले होण्याची शक्यता आहे किंवा नाही याला काही महत्त्व नाही. आम्हाला 'उद्धारक' व्हायचे आहे तेव्हा जगाने आमचे कोडकौतुक पुरवलेच पाहिजे असा या आजच्या गावउद्धारकांचा आग्रह आहे.
 गावे बिचारी खचत आहेत. कर्जबाजारी झालेले शेतकरी विष पिऊन जीव देत आहेत. अशा गावांत कॉम्प्युटरची स्थापना करून 'गावची लक्ष्मी' परत आणण्याचा हा कार्यक्रम म्हणजे पार कळा गेलेल्या म्हातारीला, पु. ल. देशपांड्यांच्या शब्दांत, 'सिगरेट पाकिटातील चांदी लावून शोभा आणण्याचा' प्रकार आहे.
 शोषखड्डे आणि बिनधुराच्या चुली यांच्याऐवजी उद्धारकांच्या हाती गणकयंत्र आले एवढीतरी गरीबी हटलीच की नाही?

दि. २०/६/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २४४