पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/240

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काम करून काही लाभदायक परिणाम दाखवूनही दिले होते. त्यांच्या कार्यक्रमामुळे अगदीच कोणाचे काहीच कल्याण झाले नाही असे म्हणता येणार नाही.
 या साऱ्या मंडळींचा इंग्रजीतील रेप्लिकेशन (Replication) हा शब्द मोठा आवडता असे. 'आपण दोनचार घरट्यांपुरते काम केले; असेच अजून पाचपन्नास कार्यकर्ते भेटले तर साऱ्या गावाचे भले होऊन जाईल; आणि आपल्यासारखे कळकळीचे व व्यवस्थापनकुशल लाख, दोन लाख कार्यकर्ते मिळाले की साऱ्या हिंदुस्थानच्या गरिबीचा प्रश्नच संपून जाईल.' अशी त्यांची धारणा होती. विश्वाचे कोडे गवसल्याचा कांगावा करणारे बाबा चेहऱ्यावर ज्या प्रकारचा धीरगंभीर भाव बाळगतात त्याच कोटीतील यांचा चेहरा. कोणाला न सुटलेले गरीबीचे कोडे आपण सोडवल्याची धुंदी त्यांच्या शब्दाशब्दात जाणवे.
 शेतकरी संघटनेची लाट साऱ्या महाराष्ट्रात पसरली आणि पोरेटोरेदेखील, ग्रामोद्धाराचे कंकण हाती बांधलेल्या महात्म्यांना गरिबीच्या अंकगणितातील प्रश्न टाकू लागले. एक एक करीत ही सारी मंडळी मागे हटली, कोणाला त्यांची फारशी आठवणही अलीकडे होत नाही.
 ग्रामोद्धारकांची ही उज्ज्वल परंपरा संपली, की काय असा प्रश्न पडू लागला आणि गेल्या आठवड्यात एकदम लक्षात आले, की ही जमात संपलेली नाही, जमिनीत खोल मुळे रुजवून बसलेली आहे. काळाच्या ओघाबरोबर त्यांचा जुना 'सर्वोदयी थाट' संपला आहे आणि नेहरूशर्ट, पायजमा व शबनम कालबाह्य झाले आहेत. कार्यक्रम सर्वोदयी तोंडवळ्याचे राहिलेले नाहीत. आधुनिकातील आधुनिक तंत्रज्ञाने या जमातीने आता हाताळायला सुरुवात केली आहे आणि त्यातूनच पुन्हा साऱ्या गावच्या गरिबीच्या दैत्याचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीतलावर आपण संप्रती नवा अवतार धारण केला असल्याच्या थाटात ग्रामोद्धारकांची ही नवी पिढी पोसते आहे.
 शहरांत गणकयंत्रे आता घरोघरी झाली आहेत. अगदी शाळकरी मुलेसुद्धा त्यांना रस वाटणारी काही 'जानकारी' इंटरनेटवर मिळते काय हे शोधत तासच्या तास घालवतात.
 याउलट, खेडेगावात टेलिव्हिजन पोहोचला तरी कॉम्प्युटर फारसा पोहोचलेला नाही. तालुक्याच्या किंवा बाजारपेठेच्या गावात तो येऊन थांबला आहे. जेथे वीज नाही आणि टेलिफोनची तार आपल्या लहरीप्रमाणे काम करते तेथे काँम्प्युटरने जावे कसे?

 एका सज्जन गृहस्थांची गाठ पडली. परदेशात अनेक वर्षे काम करून,

अन्वयार्थ – दोन / २४२