पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/238

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






ग्रामोद्धारक- शबनम ते संगणक


 तेवीस वर्षापूर्वी मी परदेशातून परत आलो. भारतात परतल्यावर काय करायचे याचा कच्चा आराखडातरी ठरलेला होता. समजून उमजून कोरडवाहू जमिनीच्या शोधात निघालो. जगभरच्या गरीब देशांच्या गरीबीचा उगम शेतीत असल्याचे वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यात जाणवले होते. राजधानीचे शहर सारे झकपक; श्रीमंत देशांच्या राजधान्यांच्या तुलनेत फारसे कुठे कमी नाही. पण तेवढे शहर सोडून पंचवीसतीस मैल बाहेर गेले की डोळ्यासमोर येणाऱ्या खेड्यांची भणंगता शतकानुशतके लवमात्रही बदललेली नसते हे लक्षात आले होते.

 परदेशांत असताना पाण्याची आणि बिगरपाण्याची शेती यांत काही मोठा फरक जाणवला नव्हता. भारतात परतल्यावर मात्र बागायती आणि कोरडवाहू म्हणजे जमीनअस्मानाचा फरक असल्याचे प्रवाद जागोजागी, क्षणाक्षणाला कानावर आदळू लागले. बागायतदार म्हणजे ऊसशेतकरी म्हणजे माजलेला, धनदांडगा अशी शहरवस्तीत सगळ्यांची खातरजमा झालेली. गरिबीचे मूळ कारण शोधून काढायला निघालेला मी धनदांडग्या शेतीत जाऊन काय करणार, कपाळ सार्वत्रिक प्रवादाचा माझ्यावर परिणाम झाला आणि शेतीच्या प्रयोगासाठी जमीन घ्यायची ती कोरडवाहूच, असा मी आग्रह धरला.
 त्या काळी रावसाहेब शेंबेकर म्हणजे मोठी मातब्बर बागायतदार आसामी समजली जात असे. कोठूनतरी कर्णोपकर्णी त्यांच्या कानावर बातमी गेली की, स्वित्झर्लंडमधून परत आलेला कोणी वेडा पीर शेतीच्या प्रयोगासाठी कोरडवाहू जमिनीच्या शोधात आहे. भला माणूस आपणहून मला पुण्यात भेटायला आला. बागायती शेतीतूनसुद्धा गरीबीच निघते असे तहेतऱ्हेने ते मला पटवून देऊ लागले. पहिला प्रयोग म्हणून तरी मी बागायतीच शेती करून पहावी, त्यासाठी

अन्वयार्थ – दोन / २४०