पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/234

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जानकी छाव्यांच्या संरक्षणाकरीता सरसावणाऱ्या सिंहीणीच्या त्वेषाने गावकऱ्यांवर तुटून पडली. साऱ्या गावाला तिने शाप दिला, 'या परिसरात गहू कधीच उगवणार नाही.' "
 गावकरी मोठ्या अपराधी भावनेने सांगत होते, "खरंच साहेब, गहू कधी येथे उगवलाच नाही; गावकऱ्यांनी लावायचा कधी प्रयत्नही केला नाही. अलीकडे पंजाबमधून हायब्रीड गहू आला तेव्हा लोक तो लावू लागले."
 साऱ्या गावाने आपल्या पूर्वजांच्या अपराधाचा इतक्या निखळ प्रामाणिकपणाने जवाब द्यावा ही बाब कोणत्याही शीलाखंडापेक्षा मला अधिक विश्वसनीय वाटते.
 सीतामातेच्या या दिव्याचे काही स्मारक व्हायला पाहिजे असे वाटले. त्या काळी निवडणुकांच्या राजकारणासाठी अयोद्धेतील मशिद पाडून तेथे राममंदिर बांधण्याचा मोठा अट्टाहास चालू होता. कोट्यवधी रुपये त्या कामासाठी खर्च होत होते. अयोध्या मंदिराचे काही होवो, राममंदिरांचा देशात काही तोटा नाही. राम पुरुषोत्तम कितपत होता यासंबंधी शंबूकवादी संशय उभा करतात, पण जनककन्येच्या दिव्यत्वाबद्दल कोठे चकार शंकासुद्धा घेतली जात नाही.
 तेव्हापासून रावेरीचे गावकरी आणि शेतकरी महिला आघाडी एकत्र होऊन रावेरी गावी सीतेचे काही स्मारक असावे, साधने जुटविता आल्यास परित्यक्ता निराधार स्त्रियांना तेथे आतातरी लापशीसाठी पसाभर गहू मिळण्याची सोय व्हावी अशी योजना आखीत आहेत. गावकऱ्यांनी जमीन देऊ केली आहे, श्रमदानाची तयारी ठेवली आहे. पण यथोचित स्मारक म्हणजे मोठी खर्चाची बाब आहे. ज्या संघटनेचे त्यातले त्यात बरे कार्यकर्ते मोटारसायकलीत रॉकेल घालून प्रचाराचे काम करतात ती या कामासाठी पैसा कोठून उभा करणार? दहा वर्षे झाली, काम रखडले आहे. देशभर त्या अवधीत कित्येक स्वामीमहाराजांची वैभवशाली मंदिरे उभी राहिली. वनवासी सीतेचे रावेरीतील मंदिर अजूनही भग्नावस्थेत आहे; सीता अजूनही वनवासीच राहिली आहे.

दि. १०/१/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / २३६