पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांचा संगम घडवून आणला, हाँगकाँगच्या खिडकीचा चातुर्याने उपयोग केला. परिणाम असा की, चीन एक आर्थिक ताकद बनत आहे. 'मधल्या काळात माओ-त्से-तुंग आला नसता तर आमचा चीन आजपावेतो जगातील प्रथम क्रमांकाची महासत्ता बनला असता,' असे तेथील जाणकार म्हणतात.
 दोन देश, दोन संस्कृती, संकटाचा सामना करण्याच्या दोन पद्धती इंडिया वेगळा देश, वेगळी पद्धती. औषध देणाऱ्याच्याच हाताला चावण्याचा कार्यक्रम येथे मोठा लोकप्रिय होत आहे. सध्याची स्थिती जर पाहिली तर आगामी निवडणुकीत लायसन्स-परमिटवादी सत्तेला हात घालतील अशी लक्षणे दिसतात.
 फुटकळ कामगार नेते, दत्तोपंत ठेंगडी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती सर्वंकष सत्ता आली तरी लायसन्स-परमिट धोरणे त्यांना राबविता येतील हे काही शक्य नाही; देवेगौडा, यशवंत सिन्हा यांनी सत्ता हाती येताच हृदयपरिवर्तन करून घेतले तसेच यांचेही होईल. सत्ता हाती आल्यानंतरही 'सुधबुध खोयी' अवस्था संपली नाही आणि सरकारशाहीचा हेका कायम ठेवला तर देशावरील आर्थिक अरिष्ट टळणार नाही; परिवर्तनाचा कालखंड आणि त्यातील वेदना अधिक कठोर व दीर्घकालीन होतील एवढेच. जुन्या अर्थव्यवस्थेला 'झटका' द्यायचा की 'हलाल' करायचे एवढाच विकल्प वास्तविक पुढे आहे.
 शेतकरी कामगारांच्या करूणेचा पुतळा दाखवणारे या समाजाच्या वेदना दीर्घकाळ लांबवतील आणि जीवघेण्या करतील ही या 'अवेळी एप्रिलफूल' ची मस्करी आहे. जे या मस्करीच्या हास्यकल्लोळात सामील होताहेत त्यांच्याबद्दल काय लिहावे? खिस्तवचन त्यांना चालायचे नाही पण, 'प्रभो, त्यांना क्षमा कर, ते काय करीत आहेत हे त्यांनाच समजत नाही,' एवढेच म्हणता येईल.

दि. ३/५/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / २२४