पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/219

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अवेळी 'एप्रिलफूल'ची मस्करी


 भारतीय संस्कृतीत सभ्य समाजाला आपल्या मनात साचलेले गरळ ओकण्यासाठी शिमग्याच्या दिवशी मुभा असते. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य परंपरेत १ एप्रिल रोजी एकमेकांना मूर्ख बनविण्याचा महोत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी कोणी काही थट्टामस्करी केली तरी ती मनावर घ्यायची नसते, थट्टामस्करीच्या बळीनेसुद्धा सार्वत्रिक हास्यकल्लोळात सामील होऊन जायचे असते. आजकाल भारतीय समाजात विशेषेकरून नेहरूप्रणित समाजवादी नियोजन व्यवस्थेत प्रस्थापित समाजात एकमेकांच्या नावाने शिमगा करायला आणि सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवायला ठराविक दिवसाचे बंधन राहिलेले नाही.
 मग 'एप्रिलफूल' च्या बळीने थट्टामस्करी मनावर न घेता, त्यामुळे तयार झालेल्या हास्यकल्लोळात सामील व्हावे हा नियम सर्वकाळ लागू धरावा काय? त्या पलिकडे जाऊन हा नियम चळवळी, आंदोलने, संप किंवा बंद यांनाही लागू धरावा काय? कोणी संप केला, बंद पाळला त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली, नुकसान झाले तरी राग गिळून टाकून त्यानेही असली थट्टामस्करी माफ करून ह्या कल्लोळात सामील व्हावे काय?

 २५ एप्रिलच्या महाराष्ट्र बंदचे आयोजन करणाऱ्या डाव्या मजूर संघटना होत्या, काही मध्यममार्गी पक्षही होते, पण बंद यशस्वी झाला तो शिवसैनिकांच्या धाकाने याबद्दल सर्वांचे एकमत आहे. देशाला स्वातंत्रय मिळूनही सर्वसामान्य नागरिकांच्या अवरुद्ध राहिलेला मार्ग खुला करणाऱ्या खुल्या व्यवस्थेला विरोध करण्यासाठी पाळलेला हा बंद म्हणजे सर्वसामान्यांच्या थट्टामस्करीचाच भाग होता. व्हलेंटाईन दिवसासारख्या आपुलकी व्यक्त करणाऱ्या सणालादेखील तो पाश्चिमात्य आहे म्हणून ज्यांचा कडवा विरोध आहे ते शिवसैनिक नागरिकांना अवेळी 'एप्रिलफूल' करणारा महाराष्ट्र बंदचा कार्यक्रम, हा काही थट्टामस्करीचा

अन्वयार्थ - दोन / २२१