पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काम आम्ही आत्मसात केले नाही; समाजातील सर्व जातिवर्गाना बंधुभावाने एकत्र आणण्याचा विचारही आम्हाला शिवला नाही; आर्थिक सामर्थ्य आणि हत्यारे यांचे संपादन करण्याचा ध्यास आम्ही घेतला नाही.
 एवढे इंग्रजी साम्राज्य आले. त्यांच्या अंमलापासून आणि इंग्रजी विद्येपासून जो काय लाभ मिळवायचा तो काही मूठभर शहरी सवर्णांपुरताच मर्यादित ठेवावा, बहुजन समाजापर्यंत त्याचा संपर्कही पोहोचू देऊ नये असा 'आंधळा' राष्ट्रवाद फोफावला. जोतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी कसोशीने प्रतिवाद केला; पण तो निष्फळ ठरला.
 पन्नास वर्षांंपूर्वी स्वातंत्र्य मिळाले, आपले भाग्य ठरविण्याचे सर्व अधिकार आपल्या हाती आले आणि पन्नास वर्षांत आम्ही सारे वाटोळे करून बसलो; कोण्या राजबिंड्या पुढाऱ्यांच्या सत्तापिपासेपोटी समाजवादाच्या कुंपणात स्वतःला कोंडून घेतले; स्वातंत्र्यात आपले आपल्यालाच कुंपण घालून घेतले.
 इतिहासाने जगाशी संपर्क साधण्याची आणखी एक संधी नव्या अर्थव्यवस्थेच्या निमित्ताने आपल्यापुढे आणून ठेवली. लगोलग साऱ्या मुखंडांनी तिचा दुःस्वास चालू केला. डावे असोत, उजवे असोत; पंख उभारून उड्डाण घेण्यास साऱ्यांचा कडवा विरोध आहे. विरोधी पक्षातील राजकारण्यांनी आकांडतांडवाचा कावा करून सत्तास्वार्थ साधण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे; पण सत्ताधारी पक्षाच्या नात्यागोत्यातील आणि 'आजोळ'च्या मान्यवर नेत्यांनीही त्यांच्या स्वत:च्या सरकारचे अस्तित्व धोक्यात यावे इतक्या टोकापर्यंत जाऊन नव्या व्यवस्थेला विरोध करण्याची मोठी जबरदस्त आघाडी उघडली आहे. सर्वांची हाकाटी एकच- 'आम्हाला वाचवा. परदेशी उत्पादकांना त्यांचे सरकार मदत करते, त्यांचे कामगार गुलामासारखे राबतात, कुशलता जोपासतात त्यांच्याशी आम्ही टक्कर ती काय देणार? एवं च, सरकारने स्वदेशी उत्पादकांना निवारा द्यावा, परदेशी चांगला माल स्वस्त भावात येऊ देऊ नये, त्यावर कर लावून तो महागडा करावा; असे संरक्षण देणे सरकारचे कर्तव्य आहे, इत्यादी, इत्यादी.
 जगात अनेक देश आहेत; सगळे काही सारखे नाहीत. काही देशांत खनिजांची प्रचंड संपत्ती आहे; कोठे निसर्गाची अनुकूलता, कोठे सृष्टी डोळे वटारून आहे. असे फरक आहेत म्हणून तर व्यापाराची आवश्यकता तयार होते; 'मला जमते ते मी करेन, तुला बरे जमते ते तू कर, आपण एकमेकांत देवघेव करू,' असा 'सर्वहितेषु व्यापार' करण्याचा विचार केला जातो.

 एखाद्या कालखंडात एखादा देश उत्पादनात बलाढ्य झाला, तुलनेने शेजारचा

अन्वयार्थ - दोन / २१८