पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/215

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



बाजारात धांगडधिंगा काय कामाचा?


 शेतकऱ्यांचे पुढारी, कामगारांचे नेते, मोठे कारखानदार, छोटे कारखानदार साऱ्यांचा एकच थयथयाट चालू आहे - 'आता बाजार खुला होणार, दुसऱ्या देशांचा माल गिऱ्हाइकापुढे वाढून येणार, आता आमच्या मालाला कोण विचारणार? विष खाऊन जीव देण्यापलीकडे काही गत्यंतरच उरले नाही.'
 एरव्हीही सर्व दु:खे. संकटे, पराभव यांचा दोष दुसऱ्या कोणाच्यातरी माथी मारून आपण स्वतः मात्र सदगुणांनी परिपूर्ण आहोत असा टेंभा मिरविण्याचा आमचा राष्ट्रीय स्वभाव आहे. दोष कायमचा परकीयांचा असतो, ISI चा असतो, CIA चा असतो, भांडवलशहांचा असतो त्यामुळे आम्ही संकटात येतो, नाही तर आमच्यामध्ये काहीच उणे नाही ही आत्मप्रौढीची परंपरा निदान विष्णुशास्त्री चिपळुणकरांइतकी जुनी आहे. इंग्रज साम्राज्य आले, स्वराज्य बुडाले. भारतीय समाजव्यवस्थेचा चौफेर पाडाव झाला. तरीही, 'आम्ही आणि आमची संस्कृती श्रेष्ठच आहे. इतिहासाच्या कालचक्रात चक्रनेमिक्रमाने एक रहाटगाडगे वर जायचे एक खाली यायचे हे असे चालायचेच. सध्या आमच्यावर पाळी खाली जायची आली आहे, पण लवकरच यथावकाश आमचे गाडगेही आपोआपच वर चढेल.' हा चिपळुणकरी युक्तिवाद प्रत्येक पराभवाच्या क्षणी हिंदुस्थानी लोकांनी वापरला आहे.

 एवढ्या लांबच्या वैराण प्रदेशातून मुसलमानांच्या झुंडी आल्या, दुर्लघ्य पर्वतांवरून त्यांनी तोफा वाहून आणल्या आणि सारा देश पादाक्रांत केला यात आमच्या काही उणिवा जवाबदार आहेत याची कोणालाही फारशी जाणीव झालेली दिसत नाही. 'हे दुष्ट यवन आमच्या श्रेष्ठ संस्कृतीचा उच्छेद करीत आहेत. त्यांचे पारिपत्य यथावकाश होईलच; तोपर्यंत परकीयांविरुद्ध द्वेष धुमसत ठेवणे एवढेच काय ते कर्तव्य,' असे समाजधुरीणांनीही मानले. तोफा ओतण्याचे

अन्वयार्थ – दोन / २१७