पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उठायची हा प्रकार लागोपाठ तीन वर्षे चालला. १९८० मध्ये 'आयातनिर्यात धोरण काही असो, शेतकऱ्यांना काही किमान भाव मिळाला पाहिजे' हे तत्त्व मान्य झाले; पण तरीही, निदान दर वर्षाआड, 'कांद्याचा भाव कधी वाढला म्हणून ग्राहकांची ओरड आणि कधी पडला म्हणून शेतकऱ्यांची तळमळ' हे चालूच राहिले. एका वर्षी महाराष्ट्र शासनाने १ रुपया किलो भावाने कांद्याची खरेदी केली आणि तो कांदा ३० पैशांनीही खपेना तेव्हा महाराष्ट्रभर सडत पडला; साऱ्या राज्यभर महिनाभर कुबट कांद्याचा वासच घवघवत होता.
 सरकारी कांदाखरेदीने शेतकऱ्यांच्या असंतोषाला तोंड फुटले एवढेच; मूळ प्रश्नाचा गाभा तसाच राहिला. शेतकरी संघटनेने आपली भूमिका अधिक व्यापक केली; 'शासनाने आर्थिक उलाढालीत हात घालूच नये' असा खुल्या अर्थव्यवस्थेचा कार्यक्रम खुलेआम मांडला.
 तीन वर्षांपूर्वी आणखी काही अघटितच घडले. कांद्याचा भाव भडकला, भडकला म्हणजे ६० रुपये किलोपर्यंत गेला. १९८० मध्ये चाकणचे कांदा आंदोलन झाल्यानंतर इंदिरा गांधींनी तेव्हा येऊ घातलेल्या निवडणुकीना 'कांद्याच्या निवडणुका' असे नामाभिधान दिले होते; पण, खऱ्या अर्थाने 'कांद्याच्या निवडणुका' तीन वर्षांपूर्वी झाल्या. कांद्याचे भाव भडकल्यामुळे भारतीय जनता पक्षाची त्या निवडणुकांत सहा राज्यांत पीछेहाट झाली. या दणक्याचा धसका घेऊन शासनाची कांदानिर्यात खुली करण्याची हिंमत होत नव्हती, ती अखेरीस २१ वर्षांनंतर झाली. कांद्याच्या आंदोलनात पिंपळगाव बसवंत, खेरवाडी, टेहरे (जि. नाशिक), कजगाव (जि. जळगाव), पानगाव (जि. बीड) इत्यादी गावांतील जे शेतकरी हुतात्मा झाले त्यांच्या स्मृतीला सर्वांनी वंदन करावे असा हा प्रसंग आहे. २३ वर्षांच्या धरसोडीच्या सरकारी धोरणामुळे शेतकरी प्राणास मुकले, कर्जबाजारी झाले, देशोधडीला लागले याबद्दल शासनाने माफी मागावी ही अपेक्षाही आज शक्य नाही. या साऱ्या काळात ज्या पक्षाची सत्ता प्रामुख्याने राहिली त्या पक्षाच्या अध्यक्षाच आपण किसानांच्या मसिहा असल्याची द्वाही फिरवत आहेत, बाकीच्या पक्षांचे विचारायलाच नको!

 शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा या विजयाने समाप्त होतो ना होतो तोच आणखी एक, विरोधाभास वाटण्यासारखा, प्रसंग पृथ्वीच्या उलट्या टोकाला घडला. कॅनडातील क्वेबेक येथे अमेरिकेतील ३४ राष्ट्रांची नवा अमेरिकन व्यापारी संघ तयार करण्यासाठी बैठक भरणार होती. या बैठकीविरुद्ध आठशे ते हजारच्याच जमावाने निदर्शने केली; पण मोठी विक्राळ,

अन्वयार्थ – दोन / २१४