पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आयात निर्बंध उठले, कोणते आकाश कोसळले? त्यापैकी कोणत्याच मालाच्या आयातीत लक्षणीय वाढ झालेली दिसत नाही. त्यांतील २०० वस्तूंचीतर आयातच झालेली नाही. मोठी वाढ झाली ती सुपारी, तेंदुपत्ती, कुलुपे, लेखण्या, काचसामान, खेळणी, बॅटरी सेल्स्, सफरचंद इत्यादींच्या आयातीत. पण, त्यांच्या आयातीमुळे आयातीतील एकूण वाढ १० कोटी रुपयांच्या वर नाही. हे झाले गेल्या वर्षीचे. पुढील वर्षी काय होईल? आयातीचा महापूर येऊन कोसळेल का? हिंदुस्थानातील उत्पादन अकार्यक्षम राहिले, किमती महागड्या राहिल्या तर परदेशातील माल आपल्या बाजारपेठेत उतरेल यात काहीच शंका नाही. तो तसा उतरावा हाच मुळी व्यापार खुला करण्याचा हेतू आहे. पण, आयात प्रमाणाबाहेर होऊ लागली तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडे अनेक साधने आणि उपाययोजना आहेत. त्यांचा शहाणपणाने वापर झाला तर आपल्याकडील उत्पादक आणि उद्योजक यांना जागतिक दर्जाची कार्यक्षमता संपादण्याइतकी उसंत आणि अवधी निश्चित मिळू शकेल.
 मग, उद्याच्या १ एप्रिल रोजी जणू काही नवा भूकंप व्हायचा आहे अशा अफवा कोण पसरवीत आहेत? यादी करणे काही कठीण नाही. लायसेन्स्-परमिट व्यवस्था संपल्यामुळे दुःखी होणारे नेते, परमिटचा फायदा घेणारे तस्कर व काळाबाजारवाले आणि हुकुमी बाजारपेठ ताब्यात ठेवून गचाळ माल ग्राहकाच्या गळी उतरवून चंगळ साधण्याची सवय झालेले उद्योजक या यादीच्या अग्रभागी राहतील. उद्या १ एप्रिल रोजी काहीच संकट अकस्मात कोसळणार नाही; एक परिवर्तन होईल आणि त्यातून देशाची मोठी प्रगती होईल. आयातीवरील बंधने उठविण्यामुळे उत्पात होणार आहे अशा अफवा हा जनतेला 'एप्रिल फूल' बनविण्याच्या नेतातस्करादींच्या कार्यक्रमाचा भाग आहे असे समजून शहाण्यांनी आपल्या आपल्या कामात राहावे हे भले!

दि. २८/३/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / १९८