पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्यापासून रद्द होणार आहेत. आयातीवरील बंदी आणि निर्बंध समाजवादी नियोजनाच्या काळात घातले गेले. परकीय चलन दुर्मिळ, त्याचा वारेमाप उधळपट्टीने खर्च होऊ नये हा वर वर सांगायचा हेतू. प्रत्यक्षात 'इंपोर्टेड' मालाची 'क्रेझ' असलेल्या या देशात आयात मालाच्या व्यापाराचा फायदा फक्त आपल्या पुढ्यातील लोकांनाच व्हावा अशा पद्धतीने या बंधनाची अंमलबजावणी झाली. आयात म्हणायला तेवढी सारी बंद; पण ज्यांचे काही लागेबांधे असतील तर त्यांना लायसेन्स् मिळू शके. काही वेळा लायसेन्स् चा उपयोग करून ही मंडळी स्वतःच आयात करीत; पण बहुतेक वेळा इतकी यातायात कशाला म्हणून लायसेन्स् काळ्या बाजारात विकून टाकून गडगंज पैसा कमवीत.
 जागतिक व्यापार संस्थेने देशादेशांतील व्यापार खुला करण्यासाठी जे नियम घातले त्यांतला सर्वांत पहिला नियम हा, की आयातीवरचे असले निर्बंध संपूर्णपणे संपले पाहिजेत. निर्बंध ठेवा; पण ते पारदर्शी असावेत, सर्व देशांना समान लेखणारे असावेत आणि देशातील सगळ्या नागरिकांना आयात करण्याबद्दल सारखाच अधिकार असला पाहिजे. निर्बंध काढा आणि त्याऐवजी त्यांचा परिणाम साधण्यासाठी आयातीवर योग्य त्या प्रमाणात आयात शुल्क लावा असा हा साधा नियम आहे. आयात शुल्क किती लावायचे याचा नियम ज्या त्या देशाने करावयाचा आहे. वेगवेगळ्या मालासाठी किती आयात शुल्क लावणे आपल्याला आवश्यक वाटते याची नोंद ज्या त्या देशानेच करावयाची आहे. एकदा तशी हमी दिली म्हणजे त्या मर्यादेत आयात शुल्काचे धोरण राहिले पाहिजे, एवढेच. हा नियमसुद्धा एवढा कठोर नाही. एखाद्या मालाची फारच आयात होते आहे किंवा एखाद्या मालाची आयात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोक्याची आहे असे सांगूनही यातून पळवाट काढता येते. थोडक्यात, आयातीवरील निर्बध दूर होणे हे काही संकट नाही, गुढ्या तोरणे उभारून साजरा करावा असा हा सर्वसामान्यांसाठी उत्सवाचा मंगलप्रसंग आहे.

 हा असला 'बहुजन सुखाय' कार्यक्रम हिंदुस्थानच्या सरकारने कबूल केलाच कसा हे मोठे कोडेच आहे. त्याचा इतिहास असा. आयातीवरील निर्बंध हटविण्याच्या या नियमाला एक अपवाद आहे. ज्या देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देवाणघेवाण आंतबट्ट्याचे आहेत त्यांना हा नियम लागू नाही. जागतिक व्यापारसंस्थेच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा हिंदुस्थानचा जगाबरोबरचा ताळेबंद आतबट्ट्याचा होता. कधीकाळी निर्यात वाढेल, परकीय चलन मुबलक होईल अशी शक्यता शासनात कोणाला वाटत नव्हती. त्यामुळे, 'जागतिक ताळेबंद

अन्वयार्थ – दोन / १९६