पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण त्यातल्या त्यात भारतातील जवान आणि लष्कर हे आदराचे विषय आहेत. देशाच्या संरक्षणासाठी सरहद्दीवर लढणारा जवान आणि त्याचे हौतात्म्य याने कोणत्याही भारतीयाचे मन हेलावून जाते. लतादीदींचे 'ऐ मेरे वतन के लोगों' इतकी वर्षे कानावर पडत असूनही अजूनही लोकांच्या डोळ्यांत पाणी उभे करते याचे कारण लोकांची जवानांविषयीची असीम आदराची भावना. जवानाला सरहद्दीवर लढायला पाठविताना त्याला कोणी कमी दर्जाच्या बंदुका, चलनवलनाची साधनसामग्री किंवा खाणेपिणे पुरवत आहे असे कळले तर लोकांचा तिळपापड होतो. जवानाच्या शौर्याचा पाठपुरावा करण्याची ज्यांची जवाबदारी, ती मंडळी साधनसामग्रीचे निर्णय लाच खाऊन करतात हे काही नवीन ब्रह्मज्ञान नाही. निदान बोफोर्स प्रकरणापासून याची सर्वांना जाणीव आहे. पण तरीही दिल्लीतील 'तहलका गटा'ने मोठा धुमाकूळ घातला याचा एक भयानक परिणाम होऊ शकतो. सरहद्दीचे संरक्षण करण्यासाठी इंच इंच जागा लढविण्याची लोकांची इच्छा कमजोर होऊन जाणार आहे.
 जाळ्यात सापडलेले लोक दोषी ठरतील, शिक्षा भोगतील किंवा सुटूनही जातील, सरकार कदाचित् पडेल, कदाचित् टिकूनही राहील. या प्रकरणी काय निष्पन्न होते त्यापेक्षा छुपा कॅमेरा बाळगणाऱ्या मंडळींच्या हाती जी प्रचंड ताकद निर्माण झाली आहे त्याचा खोलात जाऊन विचार करणे आवश्यक झाले आहे.
 जुन्या काळापासून लहान मुलांच्या मनांवर चित्रगुप्ताची भाकडकथा बिंबवली जात असे. देवाच्या दरबारी कोणी चित्रगुप्त नावाचा हिशेबनीस असतो. तो बारकाईने प्रत्येक माणसाची अगदी बरीकसारीक कर्मेही टिपून ठेवतो. माणसाने स्वत:च्या मनाला फसवले तरी तो चित्रगुप्ताला फसवू शकणार नाही. मेल्यानंतर देवाच्या दरबारात उभे राहून चित्रगुप्ताने मांडलेल्या पापपुण्याच्या ताळेबंदासमोर झाडा द्यावा लागतो, ही कल्पना, माझ्या पिढीततरी, लहान मुलांच्या मनावर इतकी ठसलेली होती, की त्यामुळे काही वेळातरी काही अनिष्ट गोष्टी हातून घडण्याचे टळत असे.

 आता देवाचेच कोणाला फारसे भय राहिलेले नाही. मेल्यानंतर पाप्यांना यमदूत काय यातना देतात त्याची चित्रे एखाद्या जुन्या देवळाच्या भिंतीवर पाहून अंगाला थरकाप सुटायचा. आता लहान बाळेसुद्धा असल्या भाकडकथांना भीक घालीत नाहीत. देव नाही, त्याचा दरबार नाही आणि चित्रगुप्तही नाही; तेव्हा देखरेख ठेवणारे कोणीच नाही. लहानपणी आईबाप आणि मोठेपणी पोलिस यांची नजर चुकवून काहीही करायला हरकत नाही अशी 'मनःपूतम् समाचरेत्'

अन्वयार्थ – दोन / १९२