पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नैसर्गिक खतांचा आणि औषधांचा आग्रह धरतो, कोणी हे निमित्त साधून म्हशीपेक्षा गायीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू पाहतो; कोणी आता शेतीची गरजच राहिली नाही, गच्चीवरही मुबलक अन्न पिकू शकते अशा आरोळ्या देतो, तर कोणी त्यापलीकडे उडी मारून चलन आणि बाजारपेठच बंद करण्याची स्वप्ने पाहतो.
 खरे पाहता नैसर्गिक शेती भारताच्या दृष्टीने मोठी लाभदायक ठरू शकते; विशेषतः जागतिकीकरणाच्या संदर्भात. आमची शेती मागास आहे म्हणजे काय? जमिनीचे तुकडे तुकडे झाले आहेत, तिची सुपीकता कमी झाली आहे, इतर देशांच्या तुलनेने आम्ही रासायनिक खते-औषधे कमी वापरतो. देशात अजून हजारो एकर शेतजमीन अशी आहे, की तिला रासायनिक खते किंवा औषधे यांचा स्पर्शही झालेला नाही.
 जगभरच्या बाजारपेठेत आज अशा जमिनीत तयार झालेल्या नैसर्गिक खाद्यान्नांना मोठी मागणी आहे. डांगसारख्या मागास भागात नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली वरी, नागली खरेदी करण्याकरिता परदेशी कंपन्या ठाण मांडायला येत आहेत. यासंबंधी मी पूर्वी लिहिले आहे. या जमिनी आणि त्यांत तयार होणारा शेतीमाल विशुद्ध नैसर्गिक आहे यासंबंधी जगाला मान्य होईल अशी प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था झाली तर भारतीय शेतकरी गोपीचंदाचा पराक्रम करू शकतो. एवढे नाही झाले तरी आपल्या जमिनीच्या लहानशा तुकड्यावर स्वावलंबनाने स्वतःच्या पोटापुरते पिकविण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या हाती आली तर जागतिक बाजारपेठेच्या जिवघेण्या स्पर्धेपासून त्याला काही आडोसा आणि निवारा मिळू शकेल. वेदशास्त्रपुराणोक्त नैसर्गिक शेतीची चळवळ जर्मन पुढाकाराने अद्ययावत् नैसर्गिक शेतीकडे वळली तर जयजयकाराच्या या दिवशीच्या साऱ्या घटनांत जर्मन शेतीमंत्र्यांची घोषणाच सर्वांत अधिक फलदायी आणि ऐतिहासिक ठरू शकते.

दि. १४/३/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / १९०