त्यांच्या संस्थेकडे पत्रे पाठवितात. आमचे आमदार, खासदार आणि राजकीय नेते यांच्याविषयी आपली घृणेची भावना सगळेच बोलून दाखवितात, काही लिहूनही सांगतात. अशा पत्रांचे एक संकलन त्यांनी प्रकाशित केल्यामुळे मोठा धमाका उडाला आहे. याच संकलनाचे चोपडे ते खासदारमहाशय सभापतींच्या पुढे नाचवीत होते.
एवढ्या शुभदिनी घडलेल्या एवढ्या धमाक्यांतून, कोणी सांगावे, कदाचित् काही परिवर्तनही दिसू लागेल.
माझ्या मते हरभजन सिंग, गोपीचंद, अन्नान आणि शौरी यांच्या या बातम्यांपेक्षासुद्धा आणखी एक वेगळीच बातमी आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
जर्मनीतील हरित पक्षाकडे शेतीमंत्रालय गेले. आजपर्यंतच्या जगभरच्या पर्यावरणवाद्यांप्रमाणे त्यांचे जर्मनीतील भाईबंदही 'थोडा शहाणपणा; पण त्यापेक्षा आचरटपणा अधिक' असले कार्यक्रम मांडीत. 'पर्यावरण टिकविण्याचे कार्यक्रम राबविण्याची जवाबदारी सरकारने घेतली पाहिजे' असा त्यांचाही आग्रह होता. पार्यवरणवादी सारे सरकारवादी असतातच, प्रत्यक्ष सत्तेत आले ते फक्त जर्मनीत. सत्ताधारी आघाडीत काही वर्षे 'हरित पक्ष' आहे; पण त्यांच्याकडे कोणी अजून पर्यावरणी कार्यक्रमाशी संबंधित खाती देत नव्हते. आता शेती खाते त्यांच्याकडे आले आहे आणि काही करून दाखविण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
युरोप खंडात मोठे वादळ चालू आहे. इंग्लंडमधील गायींच्या खाद्यात मांसाहार मिसळल्याने मज्जाव्यवस्थेवर परिणाम करणारा रोग त्या गायींत पसरला. त्यांचे मांस खाणाऱ्या मनुष्यप्राण्यांतही त्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला. सध्या सगळीकडे लाळ्या आणि खुरकुत्या रोग पसरला आहे. त्यामुळे, बहुतांशी मांसाहारी असलेल्या नागरिकांत एक भीतीची लाट उसळली आहे. माणसाला निर्भेळ अन्न खाण्याचा अधिकार असल्याची जाणीव होऊ लागली आहे आणि त्यांचा रोष एकूणच मांसाहार व कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या अन्नाच्या सर्वच उत्पादनांवर वळला आहे.
हरित पक्षाच्या शेतीमंत्रालयाने जर्मनी अधिकृतरीत्या 'नैसर्गिक शेती' स्वीकारणार असल्याचे जाहीर करून टाकले. 'नैसर्गिक शेती' ही संकल्पना मुळात हिंदुस्थानातीलच आहे. आजही नैसर्गिक शेतीचा प्रयोग करणारे हजारो लोक आपल्या देशात आहेत. त्यांच्यांतील काहींच्या भोंदूगिरीमुळे सारी नैसर्गिक शेतीची चळवळ हिंदुस्थानात मागे पडली. कोणी शंभर टक्के शुद्ध सोवळ्या