Jump to content

पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करू शकतो याची, पुसट का होईना, सुखदशी जाणीव निदान विजिगीषु भारताला झाली. 'आपले लोक म्हणजे सारे फालतू' अशी सुरुवात करून 'आपल्याकडे चांगले काही होऊच शकत नाही' असा निर्वाळा प्रत्येक विषयावर बोलताना देणारा रडतोंड्या भारत थोडा मागे पडला.
 त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत आणखी एका भारतीयाने अक्षरश: जग पादाक्रांत केले. आंध्र प्रदेशच्या २७ वर्षाच्या गोपीचंदाने इंग्लंडमधील बॅडमिंटनच्या स्पर्धेत विजय मिळविला; तोही साधासुधा नाही, पहिल्या डावात मागे हटल्यानंतर निश्चयाने आणि कसोशीने त्याने बाजू सावरली, तडाखेबंद खेळ खेळणाऱ्या चिनी खेळाडूविरुद्ध मोठा कलाकुसरीचा खेळ करीत त्याने विजय मिळविला.
 त्यानंतर लगेचच आणखी एक अद्भूत बातमी कानावर पडली. पाकिस्तानी अडेलतट्टूपणा, तालिबानचा बुद्धमूर्तीचा विद्ध्वंस यांच्याच बातम्या महिनाभर येत होत्या. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अफगाणिस्थानात गेले. तालिबान नेत्यांना मूर्तिभंजनाचा विध्वंसक कार्यक्रम थांबविण्याची त्यांनी विनंती केली. अफगाणी नेत्यांनी ती साफ धुडकावून लावली. अतिरेकी धर्मवाद्यांच्या संकटाची कधी नव्हे इतकी स्पष्ट जाणीव अन्नान यांना झाली असावी. तेथून पाकिस्तानात आल्यावर पाकिस्तानच्या लष्करी नेत्यांतही याच धर्माधतेचे बीज असल्याचे त्यांना जाणवले असावे. काश्मिरातील सार्वमतासंबंधीचा नेहरूंच्या काळात झालेला ठराव उभय पक्षांच्या संमती आणि सहकार्याखेरीज अमलात आणण्याची संयुक्त राष्ट्रसंघात तरतूद नसल्याची घोषणा त्यांनी करून टाकली.

 हरभजन सिंग कोलकत्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दांड्या एकापाठोपाठ एक उडवीत होता त्याच वेळी लोकसभेत एक खासदार हातातील चोपडे उंचावीत सभापतींचे लक्ष वेधून घेत होते. अरुण शौरींचे नाव एक तेजस्वी पत्रकार म्हणून, अभ्यासू लेखक म्हणून आणि आता सरकारी कंपन्यांच्या विसर्जनाचे पुरोहितमंत्री म्हणून सर्वश्रुत आहे. अरुणजींचे पिताजी ग्राहक चळवळीला वाहिलेली 'तुमचे आपले काम (Common Cause)' नावाची संस्था अनेक वर्षे चालवीत आहेत. या क्षेत्रात त्यांनी अनेक लढाया दिल्या आणि जिंकल्या. ग्राहकांना अपेक्षित सेवा न मिळाल्याबद्दल तक्रार गुदरून त्यांनी Air Indiaच्या विमानचालकांनाही दंड करविला होता. दुकानदारांनी धड माल न देणे, फसविणे, कारखानदारांनी भद्दा माल विकणे, बँकेतील कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना अडविणे ही मोठी मनस्ताप देणारी प्रकरणे आहेत. ती लढविणाऱ्या ज्येष्ठ शौरीजींनी आता एक नवीन आघाडी उघडली आहे. हजारो नागरिक

अन्वयार्थ – दोन / १८८