पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



नमोऽस्तु ते, जयोऽस्तु ते


 २६ जानेवारी २००१ च्या स्वातंत्र्यदिनी देशभरच्या ध्वजवंदनाची तयारी होत असतानाच सौराष्ट्रातील भूकंपाचा धक्का देशभर जाणवला; त्यानंतर गुजराथमधील मृत्यूचे तांडव, अपरिमित हानी, लक्षावधी बेघरांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कर्मकथा यांच्याच बातम्या सारख्या येत होत्या. ते सोडून दुसरे काही ऐकावे, पाहावे म्हटले तर काश्मिरातील अतिरेक्यांच्या घातपातांच्या वार्ता. या दीड महिन्यात देशभर रस्त्यांवरचे अपघातदेखील इतके विचित्र आणि भयानक झाले, की त्यांच्या बातम्या आणि छायाचित्रे पाहून विश्वास ठेवणेदेखील कठीण झाले.
 ११ मार्च रोजी, अचानक महाबळेश्वरच्या एखाद्या पॉइंटवरील दाट धुके क्षणार्धात नाहीसे व्हावे आणि सारे जग सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखे स्वच्छ दिसावे तसा एकदम आनंदीआनंदाचा दिवस उगवला. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात तसे पाहिले तर खेळकुदीला फारसे महत्त्व नाही, वर्तमानपत्रांत किंवा आता टेलिव्हिजनवर खेळांच्या स्पर्धा पाहणे एवढाच काय तो खेळाविषयीचा उह्लास; काय उत्साह असायचा तो क्रिकेटबद्दल; पण तोही क्रिकेट सामन्यांच्या सट्टाबाजीच्या घपल्यामुळे डागाळून गेला. लहान मुलेसुद्धा अलीकडे रस्त्यावर रंगात आलेला चेंडूफळीचा खेळ सोडून, दूरदर्शनवर टेस्ट मॅच पाहायला यायला तयार होत नाहीत.

 आणि ११ मार्च रोजी हे सगळे एकदम बदलले. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाच्या बल्लेबाजांविरुद्ध हरभजन सिंगने तीन चेडूंत तीन बळी घेऊन साऱ्या हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात पूर्वी कधीही न घडलेली गोष्ट घडविली. कोणी भारतीय असला काही अचाट पराक्रम करू शकतो यावर कोणाचा विश्वासच राहिला नव्हता. हे अद्भूत एकदम घडून गेले. आपणही कोणी आहोत, काही

अन्वयार्थ - दोन / १८७