पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 साऱ्या जगाची ही हताश निष्क्रियता समजण्यासारखी आहे. कोणा माथेफिरूने वासरू मारले म्हणजे शहाण्याने गाय मारावी अशा कार्यक्रमात काही अर्थ नाही. त्यातून जगभर तेढ माजेल आणि आपोआपच तालिबानचा हेतू साध्य होईल असा पोक्त किंवा डरपोक मुत्सद्दीपणाचाही यात विचार असावा. या सर्वांच्या निष्क्रियतेचे आश्चर्य वाटले तरी खेद वाटण्यासारखा नाही. खेद वाटण्यासारखा आहे तो भारतातील स्वत:ला प्रागतिक म्हणविणाऱ्या मुसलमान समाजाच्या नेत्यांच्या उदासीनतेबद्दल. मंदिर-मस्जिद वादात तारस्वराने ओरडा करणारे हे नेते या वेळी काही बोलत नाहीत ही भारतीय मुसलमान समाजाच्या दृष्टीने मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. बनातवाला, शबाना आझमी आदींसारख्या नेत्यांनी निदान घराबाहेर पडून तालिबानच्या मूर्ति-विद्ध्वंसाच्या कार्यक्रमाबद्दल, निषेधाचा नाही तरी, निदान नाराजीचा सूर काढला असता तर कोणत्याही कारणाने कोणत्याही मुसलमानाच्या सभ्यतेबद्दल, राष्ट्रप्रेमाबद्दल आणि सचोटीबद्दल शंका घेण्याचा आपल्याला ईश्वरदत्त अधिकार आहे असा कांगावा करणारे धर्ममार्तंड 'मुसलमान प्रागतिक नेत्यांच्या या चुप्पी साधण्यामुळे तालिबानच्या कृत्याबद्दल या नेत्यांना मनात आनंद होत असल्याचा' आरोप करू लागले तर उत्तर देणे कठीण होईल. शिवाय, भारतातील धर्मांध मुसलमान नेत्यांनी हिंदूमुसलमानांतील तेढ वाढविणारी कुरापतखोर भूमिका घेतली तर त्यांची आणखीनच पंचाईत होईल.
 २००१ मध्येसुद्धा जग काही फार सुधारलेले आहे असे नाही. महंमद गजनीपासून आडदांड माथेफिरू आहेत तसेच राहिले आहेत आणि त्यांच्या पुढे बुळेपणाने शरण जाणारी जनताही तितकीच षंढ राहिली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दि.७/३/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / १८६