पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहिले आहे त्यापेक्षा वेगळे काही त्यात लिहिले असेल तर ते नष्ट करायलाच पाहिजे. कुराणात जे काही सांगितले आहे तेच त्यांत सांगितले असेल तर अशी द्विरुक्ती करणाऱ्या पुस्तकांचा काय उपयोग?
 इतिहासात हे वर्णन वाचले म्हणजे असे कोणी हिरवट धर्मांध असतील यावर विश्वाससुद्धा बसत नाही; पण ही धर्मलंडांची जात संपली नाही आजही ती जगात शिल्लक आहे एवढेच नाही तर आजही त्यांना जवाब मागून त्यांचा बीमोड करणारा कोणी शिल्लक नाही. अफगाणी देशात अनेक लढाया झाल्या, स्वाऱ्या झाल्या; मंदिर, महाल उद्ध्वस्त झाले, देवळे फोडली गेली; तरीही एके काळच्या बौद्ध संस्कृतीचे काही अवशेष आजतागायत टिकून होते. गौतम बुद्धाच्या महाकाय प्रचंड मूर्ती सगळ्या संकटांशी टक्कर देत अजूनही शिल्लक होत्या. 'निवीरम् उर्वितलम्' झालेल्या तालिबानला साऱ्या जगाला धुत्काराने आव्हान देण्याची एक चांगली संधी मिळाली. गौतम बुद्धाच्या या मूर्ती मानवजातीच्या सांस्कृतिक ठेव्यांपैकी मौल्यवान वारसा म्हणून युनेस्कोनेही घोषित केलेल्या आहेत. तालिबान लष्कराने त्या मूर्ती फोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला. साऱ्या जगाला सांगितले आणि या आठवड्याच्या सुरुवातीला जगाची पर्वा न करता, या मूर्ती फोडण्याचा आपला कार्यक्रम सुरू केला. शिल्पे इतकी महाप्रचंड की ती काही हातोड्याछिन्यांनी फुटण्याजोगी नाहीत. तेव्हा त्यांच्यावर रणगाडे घालण्यात आले, विमानविरोधी तोफा चालविण्यात आल्या आणि हा सारा प्रकार सारे जग निमूटपणे पाहत राहिले. चडफडले अनेक; पण तालिबानला निर्बंध घातला जावा असे काही करण्याचे धाडस कोणालाच झाले नाही.

 कोणत्याही पुतळ्याची थोडीफार विटंबना झाली तर दंगली माजविणारे नवबौद्ध त्यांच्या आदर्शाच्या मूर्तीची विटंबना स्वस्थचित्ताने पहात राहिले. भारताच्या पंतप्रधानांनी शाब्दिक निषेध व्यक्त करून आपली हतबलता जाहीर करून टाकली. काही कडवे हिंदुत्वनिष्ठ आपापल्या घरांत सुरक्षितपणे बसून 'तालिबान लष्कराला धडा शिकविण्यासाठी यंव करायला पाहिजे, त्यंव करायला पाहिजे' अश्या वल्गना करू लागले, केले कोणी काहीच नाही. बाबराच्या काळच्या मंदिरध्वंसाच्या प्रतिशोधाचा राजकीय कार्यक्रम बनविणारे मूग गिळून गप्प बसले. इस्रायलसारखी अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्याचा अनुभव असलेली राष्ट्रे, जपान-कोरियासारखी बौद्ध धर्माचा प्रसार असलेली राष्ट्रे यांना एकत्र करून तालिबान लष्कराला शतकानुशतके याद राहील अशी कार्यवाही करणे काही अशक्य नव्हते; पण तेवढी मुत्सद्देगिरीची कुवत मवाळ भारतीय शासनाकडे

अन्वयार्थ – दोन / १८५