पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मला पटकन इतिहास आठवला. राज्याराज्यांतील सरहद्दींच्या प्रश्नावर अनेक ठिकाणी उरस्फोड चालू आहे. बेळगाव जिल्ह्याचा प्रश्न चाळीस वर्षे पेटता राहिला आहे. अजून कर्नाटक दोन पावले मागे जायला तयार नाही आणि महाराष्ट्रतर नाहीच नाही. भाषावार राज्यनिर्मितीच्या वेळी वादाचे म्हणून जे प्रदेश होते त्यांतील डांग जिल्हा हा एक. प्रश्न गुजरात आणि महाराष्ट्राने चुटकीसरशी सोडविला. बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाई यांनी जिल्ह्याचा संयुक्त दौरा काढला. दोघांनीही भाषणे केली. खेरसाहेबांनी लोकांना मोरारजींची भाषणे अधिक समजत असल्याचा कबुलीजबाब देऊन टाकला आणि डांग गुजरातचा झाला.
 आज तेथील लोकही सांगतात, सारे अधिकारीही सांगतात की, येथील लोकांची भाषा कोकणी आहे. त्यांना मराठीच अजूनही अधिक समजते. आता शाळेत गुजरातीच शिकवतात त्यामुळे थोड्या वर्षात कोकणीचाही स्पर्श संपेल आणि मराठीचाही संपर्क तुटेल; पण चाळीस वर्षांपूर्वी येथील लोकांची भाषा मराठीशी अधिक जुळणारी असणार यात काहीच संशय नसावा. मग बाळासाहेब खेरांनी डांगचे अर्घ्य का देऊन टाकले असावे?
 सौजन्याचा गुण पराकोटीला गेला की सुजनतेचाही एक अहंकार तयार होतो आणि त्या अहंकाराचा टेंभा मिरविण्यासाठी आपल्या लोकांवर अन्याय करून परधार्जिणेपणा दाखविण्याची इच्छा तयार होते. बाळासाहेबांनी महात्मेपण मिळविण्यासाठी डांगचा बळी दिला काय?
 दुसरेही एक कारण संभवते. गुजराती प्रदेशातून आलेले लाकूड आणि कोळसाव्यापारी यांचा त्या काळच्या डांगच्या अर्थव्यवस्थेवर पुरा ताबा होता. आदिवासींच्या आंदोलनाचा झेंडा गोदाताई आणि शामराव यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद्यांत जाऊन सामील होतो की काय अशी दाट शंका वाटत होती. 'नको ती बला आपल्याकडे,' असे म्हणून डांगचा बळी दिला गेला असेल काय?
 चाळीस वर्षांपूर्वी डांग हा मागासलेला जिल्हा होता, वरीनागलीवर गुजराण करणारा. त्याच्याकरता लढण्याची कोणाला फारशी निकड भासली नसावी. लोण्यासाठी नावाजलेल्या बेळगावच्या प्रश्नावर तोंडाला अधिक पाणी सुटत होते म्हणून की काय महाराष्ट्राभिमान्यांची सारी ताकद तिकडे वळली असावी. आता जागतिकीकरणाच्या कांडीने डांग जिल्हा समृद्ध झाला तर बाळासाहेब खेरांचे सौजन्य का मोरारजी देसाईचा कावेबाजपणा याचे सखोल विश्लेषण चाळीस वर्षांच्या अवधीनंतर करावे लागेल!

दि. २८/२/२००१
■ ■

अन्वयार्थ - दोन / १८२