पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






गुजरात मलब्यातून उठणार नक्की,
सरकारने मोकळीक दिली तर



 गुजरातमधील भूकंपाने सारा देश हादरून गेला आहे. दीर्घ काळ चालणाऱ्या लढाईत किंवा दुष्काळात हजारोंनी माणसे मृत्यू पावतात, जखमी होतात; पण, एका दिवशी एका क्षणापर्यंत नित्य नेमाने जीवनव्यवहार चालविणारी माणसे पुढच्या क्षणातच मरून जातात ही कल्पनाच मोठी भयानक आहे. या प्रसंगी आपणही काही केले पाहिजे अशी भावना गुजरातेतील आणि गुजरातबाहेरील सर्व नागरिकांच्या मनात तेवत आहे. सरकार अधिकृत घोषणा करो, ना करो; ही राष्ट्रीय आपत्ती आहे, केवळ गुजरात, भुज, अहमदाबाद यांच्यावर कोसळलेले संकट नाही असे सर्वांनाच वाटते. चीनचे आक्रमण झाले त्या वेळी जसे उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक मदतीला तयार झाले तसेच याही वेळी मदतीसाठी लागणारी सर्व सामग्री, कपडे, पांघरुणे, खाद्यपदार्थ, पाणी, दूध, औषधे यांचा महापूर गुजरातकडे लोटत आहे. मृत्यूचे असे आकांडतांडव भारतीयांनी पूर्वी कधी पाहिलेले नाही. नैसर्गिक आपत्तीत मदतीची व्यवस्था करण्याची जबाबदारी शेती मंत्रालयाची आहे. या मंत्रालयातील नियंत्रण कक्षाचे एक अधिकारी भूकंपाने उद्ध्वस्त प्रदेशाला भेट देऊन आले. 'मला जन्मात पुन्हा कधी शांत झोप येईल असे वाटत नाही,' अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

 पंतप्रधान झाले तरी शेवटी माणूसच आहेत. एक सारे राज्य असे उद्ध्वस्त झालेले डोळ्यांनी पाहिल्यावर हातचे काही राखून न ठेवता शक्य असेल ते झालेच पाहिजे असे, कोणाही सहृदय माणसाप्रमाणे, त्यांनाही वाटले. स्वत:च्या निधीतून ५०० कोटी रुपयांची रक्कम त्यांनी मदत म्हणून जाहीर करून टाकली. आणि वर, 'पुनर्वसन व पुनर्रचना यांसाठी प्रचंड साधनसामग्री उभी करावी लागेल, त्याच्या खर्चाचा बोजा सर्व नागरिकांना पेलावा लागेल; तस्मात्, येत्या अंदाजपत्रकात यापोटी करवाढ करावी लागेल, त्यासाठी देशाने तयार राहावे',

अन्वयार्थ – दोन / १६६