पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जात होता. खासगी वाहिन्यांवर मृतांचा आकडा शंभरहून दोनशेवर पोचला. किल्लारी भागात प्रलय माजला तो मुख्यतः अगदी छोट्या टापूत. गुजरातमधील भूकंप कच्छच्या एका टोकापासून सौराष्ट्र, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरातपर्यंत थेट महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत हादरवणारा. त्यामळे कोठे कोठे काय झाले हे कळायला काही दिवस गेले. दुसरे दिवशी सकाळपर्यंत अहमदाबाद शहरातील अनेक गगनचुंबी इमारती कोसळल्याच्या बातम्या आल्या. २६ जानेवारीच्या रात्री राजधानीतील नियंत्रण कक्षात मी जाऊन आलो. खात्रीची माहिती कुणालाच नव्हती. माझ्या हाती जो कागद दिला त्यावर मृतांचा आकडा दीडशेच्या आसपास दाखवला होता.
 २८ जानेवारीला पहिल्यांदा आकडा १० हजारांच्या वर जाईल अशी वाक्ये ऐकू येऊ लागली. २९ जानेवारीला मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी मृतांचा आकडा ३० हजारांवर असावा असा अंदाज व्यक्त केला. शोधकार्य जसजसे पुढे जाईल तसतसे मृतांचे प्रत्यक्ष आकडे आणि अंदाज बदलतच राहतील.
 इंटरनेटच्या एका अड्ड्यावर एक वेगळीच चर्चा चालू होती. १९३४ मध्ये बिहारमध्ये भूकंप झाला. तीस हजारांवर माणसे दगावली, सारा देश सुन्न झाला. महात्मा गांधींनी म्हटले, 'हा भूकंप अस्पृश्यतेच्या पापाचे प्रायश्चित्त आहे.' देशापुढे कोणताही राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्न उभा राहिला, की प्रश्न विचारला जातो, 'आज गांधीजी असते तर ते काय म्हणाले असते?' गुजरातमधील भूकंपाचा हाहा:कार महात्माजींचा आत्मा अंतराळातून कोठून पाहत असेल तर 'हे कोण्या पापाचे प्रायश्चित्त आहे', असे म्हणत असेल काय?

 गुजरात हा प्राचीन काळापासून भाविकांचा आणि भक्तीचा प्रदेश आहे. अलीकडच्या काळात तर गुजरात, सौराष्ट्रभर बाबामहाराजांचे पेव फुटले आहे. आठवलेशास्त्रींच्या स्वाध्यायापासून ते दूरदर्शनच्या चॅनेलवर तासन्तास डोळ्यात मोठी आध्यात्मिकता आणून 'नारायणो हरि'चा जप करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साधुसंत गुजरातमध्ये माजले आहेत. स्वामी नारायण पंथाने तर साऱ्या राज्यभर आपले वैभवशाली संस्थान पसरवले आहे. शाळा, वसतिगृहे, दवाखाने, इस्पितळे आणि भजन-कीर्तन-प्रवचनांचे कार्यक्रम यांची मोठी गर्दी उसळली आहे. गुजराती राज्यकर्ते नेतेही स्वामींना नमन केल्याखेरीज पुढे चालू शकत नाहीत. या साऱ्या गजबजाटात भक्तिरसाचे काहीच स्थान नाही. रोमन कॅथॉलिक चर्चच्या अधिपती पोपमहाराजांचे एक संस्थान आहे. 'प्रचंड उलाढालींचे व्यवहार तेथे चालतात देवाधर्माचा तेथे काहीच संबंध नाही', असे बिगर कॅथॉलिक ख्रिश्चन म्हणतात.

अन्वयार्थ - दोन / १६३