पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी जगत नाही. आई, मरण्यापूर्वी मला संन्यास घेण्याची परवानगी दे' संन्यास म्हणजे गृहस्थाश्रमातील मरणच. सोळाव्या वर्षी बाळाला मृत्युयोग असल्याचे भविष्यवेत्त्याने सांगितले होते. संन्यास घेतला तर बाळ कदाचित् वाचेल अशा भावनेने आईने अनुमती दिली. शंकराने पटसंन्यास घेतला आणि मगरीने पाय सोडला. बाळ शंकर संन्यासी म्हणून नदीच्या प्रवाहातून बाहेर आला.
 हा मगरीचा घाट लोक आजही दाखवतात. आता त्यात मगरी नाहीत. केलाडीच्या पूर्णेपासून संन्यासी शंकर निघाला, तो थेट मगरींनी भरलेल्या नर्मदा नदीच्या पात्राशेजारी, गौडपादस्वामींच्या शिष्यांच्या आश्रमात. हा एक योगायोगच.
 मगरीच्या घाटाशेजारी आई आर्याम्बा यांचे लहानसे वृंदावन आहे. संन्यास घेतल्यावर श्री शंकराने, 'तुझ्या शेवटच्या घटिकांत मी तुझ्याजवळ असेन', असे आश्वासन दिले. आईचा मृत्यूजवळ आला हे त्यांना कसे कळले असेल शिवशंकरच जाणे! मृत्युसमयी आर्याम्बाच्या शेजारी श्री शंकराचार्य हजर होते, हे खरे! आई गेल्यावर अंत्यविधी तर करायला पाहिजे. गावातील नम्बुद्री ब्राह्मण तर महासनातनी, कर्मठ. त्यांचे म्हणणे, 'संन्याशाने कोणताच गृहस्थ विधी करता कामा नये; अगदी जननीच्या अंत्यविधीचाही नाही.' श्री शंकराचार्यांनी आपल्या बाहूंत आईचे कलेवर घेतले. फक्त दोन ब्राह्मण मदतीला आले. एकाने मस्तक सावरले, दुसऱ्याने पाय. अशी अंत्ययात्रा झाली. दहनाच्या जागी छोटेसे वृंदावन आहे. केलाडी गावात ब्राह्मणांची दोनच कुटुंबे टिकून राहिली, बाकीची सारी वंशनाश होऊन संपली, असे गावच्या सरपंचानेच सांगितले.
 गावात आज रामकृष्ण परमहंसांचा मठ आहे. अद्वैत मत, उपनिषदे आणि योगाभ्यास यांसाठी पाठशाळा आहे. साम्यवाद्यांना शंकराचार्यांचा अतोनात तिरस्कार. त्यांचे राज्य चालू झाल्यापासून मठवासीयांना अनेक त्रास सोसावे लागले. ख्रिस्त धर्मीयांचाही गावात जागोजागी क्रूसाची प्रतिष्ठापना करण्याचा हव्यास चालू आहे.

 शेजारीच कोचिन एर्नाकुलमचा नवा विमानतळ झाला आहे. त्याला शंकराचार्यांचे नाव द्यावे अशी सूचना करण्यात आली. पण, राष्ट्रपती के. आर. नारायणन्, तेही केरळचे सुपुत्र, त्यांनी ती नाकारली. शंकराचार्य आणि विमाने यांचा काय संबंध? असा त्यांनी प्रश्न विचारला, असे सांगतात. मगरघाटाच्या आसपासचा प्रदेश साफ करावा, शंकराचार्यांच्या आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगाचे काही स्मरण होईल, असे एखादे शिल्प उभारले जावे अशी शंकरभक्तांची इच्छा आहे. अयोध्येतील राममंदिराकरिता देश उलटापालटा करू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांना

अन्वयार्थ – दोन / १५९