पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संख्येने भिख्खू ध्यानधारणा करीत होते, शहरोशहरी भिक्षापात्र घेऊन फिरत होते. 'बुद्धाला, धर्माला आणि संघाला' शरण गेल्याच्या प्रार्थनांनी सारी आसमंते गजबजून जात होती. त्या साऱ्या रम्य नगऱ्या, ते चक्रवर्ती बौद्ध सम्राट, त्यांची साम्राज्ये, बौद्ध मठ, सगळे अचानक नाहीसे कसे झाले? बौद्धांचा पराभव शस्त्रास्त्रांच्या मदतीने लढाया मारून झाला नाही; कत्तली झाल्या नाहीत, मठांना आगी लावण्यात आल्या नाहीत. तरीही बौद्ध मत संपले; एवढेच नव्हे तर, कोठेही द्वेषभावना शिल्लक न राहता संपले. हा दिग्विजय एका तरुण संन्याशाने केला. हातात दंड, अंगावर संन्याशाची भगवी वस्त्रे, पुढे अद्वैतवादाची प्रतीकात्मक मशाल घेऊन चालणारा शिष्य. आव्हान देणारा कोणी भेटला, की वादविवादाला सुरुवात!
 वादविवादात विषय काय? युक्तिवाद काय? यासंबंधी काही माहिती असण्याचे ते वय नव्हते. मंडन मिश्र या मीमांसक महापंडिताशी झालेल्या वादाच्या वेळी पंच म्हणून मंडन मिश्रांची पत्नीच बसली होती. स्वगृहिणीच पंच असतानाही मंडन मिश्राला पराभव स्वीकारण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. हे सारेच मोठे अद्वितीय वाटे. वादविवादांच्या वक्तृत्व स्पर्धा जिंकण्याचा त्या वेळी मौठा कैफ होता. साहजिकच, शंकराचार्य म्हणजे परमोच्च आदर्शबिंदू वाटे. महापंडिता भारतीने एक प्रश्न विचारला. नेमका प्रश्न काय ते आजही कोणी सांगू शकत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीत 'स्वामित्वाने शरणता' एवढा फरक असेल तर सर्वांभूतीचा आत्मा एकच स्वरूपी कसा काय असू शकेल? असे त्या प्रश्नाचे स्वरूप होते, असे कोठेतरी वाचनात नंतर आले. बाईंनी 'शब्दाचे अवडंबर नको, आत्मप्रचीतीने बोला,' असे रोखठोक सांगितले आणि ब्रह्मचारी शंकराचार्यांच्या अनुभूतिसिद्धांतालाच हात घातला. हजारो स्मृतिश्रुतीनी अग्नी थंड आहे, म्हणून सांगितले तरी ते मी मानणार नाही, असे परखडपणे सांगणाऱ्या श्री शंकराचार्यांपुढे धर्मसंकट उभे राहिले. त्यांनी 'परकाया प्रवेश' करून गृहस्थाश्रमाचा अनुभव संपादन केला आणि प्रश्नाचे उत्तर दिले, अशी आख्यायिका आहे. नेमके उत्तर काय दिले हे कोणालाच माहीत नाही. अर्धवट माहितीच्या धुक्याधुक्यातून शंकराचार्य या व्यक्तिमत्त्वाविषयीमात्र प्रचंड आदर आणि काहीशी भक्ती
 'वाक्यार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम् वेदकोटिभिः
 ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परः'

 या गर्जनेची विस्तृत मांडणी करण्यासाठी बत्तीस वर्षांच्या वयात १५३

अन्वयार्थ - दोन / १५७