पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गाऊ त्यांना आरती


 व्यवहाराचा पाश न ठेवता आकाशात उत्तुंग भराऱ्या घेण्याच्या वयात माझे जे ऐतिहासिक आदर्श होते, त्यात श्रीमत् शंकराचार्य यांचे स्थान सर्वोच्च. आयुष्यमान अवघे बत्तीस वर्षांचे. सोळाव्या वर्षी संन्यास. अद्वैत मत म्हणजे नेमके काय याची समज येण्याच्या आधीही, मत काही का असेना, हजारो महापंडितांशी नियम ठरवून वादविवादाला बसायचे आणि वादविवादात ते हरल्याचे त्यांच्याकडून वदवून घ्यायचे हा पराक्रमच मोठा अद्भुत वाटे. 'आपल्या देशात वेगवेगळया विखुरलेल्या प्रदेशात समानता कोणती?' या प्रश्नाचे उत्तर 'श्री शंकराचार्यांचा प्रभाव आणि त्यांची पीठे' हेच होय. वाहतुकीची काहीही साधने नसलेल्या काळात द्वारका, पुरी, बद्रीनाथ, शृंगेरी असे चार दिशांना चार मठ स्थापणाऱ्या श्री शंकराचार्यांबद्दल मनात असीम आदर होता.
 गौतम बुद्धाचा जन्म आपल्या देशातला; त्यांचा धर्म आजही जगात अग्रगण्य मानला जातो; पण, तो सारा चीन, जपान पूर्व आशियायी देशांत. आपल्याकडे आंबेडकरांच्या अनुयायांनी उभा केलेला दलितयान पंथ सोडला तर हीनयान व महायान या बौद्ध धर्मातील दोन महत्त्वाच्या पंथांचा येथे मागमूसही नाही.
 अलीकडे जगन्नाथपुरीला जाऊन आलो. परत येताना अतिविशिष्ट व्यक्तींत फक्त जपानचे भारतातील राजदूत आणि त्यांचा परिवार होता. इंडियन एअर लाईन्सचा नोकरवर्ग अतिअतिविशिष्ट व्यक्तींपलीकडे त्यांचे आदरातिथ्य करीत होते. पुरीच्या बौद्ध स्तूपांभोवती प्रचंड देवळे बांधायचे काम जपानी मदतीने होते आहे. साहजिकच, जपानी राजदूतांना तेथे फार मानले जाते. परदेशात काय मान असेल तो असो, हिंदुस्थानातमात्र बौद्ध धर्म फक्त नावालाच शिल्लक राहिला आहे.

 हे झाले कसे? बौद्धांकडे राजसत्ता होती, धर्मसत्ता होती; जागोजाग हजारोंच्या

अन्वयार्थ - दोन / १५६