पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



जागतिकीकरणाचे आव्हान प्रतिभेने पेलणे शक्य


 प्रधानमंत्री श्री. अटल बिहारी वाजपेयी आठवड्याचा व्हिएतनाम, इंडोनेशिया, बाली बेटे यांचा दौरा करून, मकर संक्रांतीच्या दिवशी दिल्लीत परत आले. या दौऱ्याचा मुख्य हेतू हा आशिया परिसरातील देशांतील घनिष्ट आर्थिक संबंध तयार करून या देशांशी असलेला व्यापार वाढविणे हा होता.
 दौऱ्यावर निघण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जागतिक व्यापार संस्थेच्या आगामी वाटाघाटींसाठी भारतात सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्याआधी, पंतप्रधानांनी जागतिकीकरणाच्या तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यन्त वैश्विकीकरणाचा संदेश पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
 एक दिवस वैश्विकीकरणाचा पुरस्कार आणि नंतर आठवडाभर प्रादेशिक व्यापारी संबंध घनिष्ठ बनविण्याची धडपड यात काही विरोधाभास आहे का? जागतिक व्यापार संस्थेच्या करारात प्रादेशिक व्यापारासंबंधीची भूमिका मोठी स्वागताची नाही. पण, खरे पाहिले तर, जागतिक व्यापारवाद्यांनी प्रादेशिक व्यापार व्यवस्थांचा दुस्वास करण्याचे काही कारण नाही. जगाला व्यापणारी व्यापारव्यवस्था तयार होण्यास सर्व राष्ट्रांनी एकछत्री व्यापारव्यवस्था उभी करणे हा खरा मार्ग; पण कोणी देश मधला टप्पा म्हणून आसपासच्या जवळपासच्या समानधर्मा राष्ट्रांशी मर्यादित व्यापार करारमदार करेल तर त्याने जागतिक व्यापारास बाधा येते असे नव्हे.

 एकाच भूखंडातील किंवा शेजारी राष्ट्रांत हवामान, सामाजिक परिस्थिती, लोकांची राहणीसाहणी यांत पुष्कळसे साम्य असते. यामुळे अशा समानधर्मी देशांत व्यापार अधिक सुकर होतो. कोणी फार मोठा, कोणी फार गरीब असा भेद नसल्यामुळे परस्परांत वितंडवादांना वाव राहत नाही.

अन्वयार्थ – दोन / १५२