पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'युरोप - २०००' प्रदर्शनाच्या शेतीविभागात भारतीय मसाल्यांच्या पदार्थांचा एक मोठा स्टॉल ठेवण्यात आला होता. भारतातील मसाल्याचे पदार्थ पूर्वापार प्रसिद्ध आहेत. इंग्लिश, फ्रेंच व्यापारी भारताकडे पहिल्यांदा आले ते मुख्यतः मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करण्यासाठीच. यातून मोठा इतिहास घडला. त्यातून मसाल्याचे पदार्थ पुरविणारे इतर देश पुढे आले आणि भारत मागे पडला. 'युरोप -२०००' प्रदर्शनात 'भारतातील पदार्थ रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता पिकविण्यात आले आहेत' यावर मोठा भर देण्यात आला आहे. युरोपीय देशांतील आणि अगदी अमेरिकेतीलही ग्राहक, जैविक शेतीमाल वापरावा, त्यामुळे आरोग्यसंवर्धन चांगले होते या विचाराने भारले गेले आहेत. जैविक शेतीमालाची मागणी दरवर्षी दहा ते बारा टक्क्यांनी वाढते आहे आणि या मालासाठी पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यन्त अधिक किंमत देण्यास ग्राहकही आनंदाने तयार होतात. प्रदर्शनातील भारतीय मसाल्यांच्या दालनावर ग्राहकांच्या उड्या पडल्या. येत्या वर्षात मसाल्याच्या पदार्थांची निर्यातही वाढलेली दिसावी. जैविक शेतीचे प्रचारक श्री. श्रीपाद दाभोळकर जैविक प्रश्नावर बोलताना बाजारपेठेचा मोठा रागराग करतात. 'बाजारपेठेत जावेच कशाला? खिशात हात न घालता शेतीचे उत्पादन करावे, शुद्ध सात्त्विक पिकावर मस्त जगावे' असा त्यांचा धोशा असतो. जैविक शेतीची भरभराट जैविक मालाला मिळणाऱ्या वाढीव किमतीमुळे होईल या घटनेने दाभोळकरांना आनंद होईल का दुःख हे सांगणे कठीण आहे!
 भारतीय स्त्रियांची सोशिकता जगप्रसिद्ध आहे. 'एकच प्याला'तील सिंधु हा आदर्श. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाया म्हणजे तर 'दीनवाण्या गायाच'. पहाटे झुंजूमुंजू होण्याच्या आधी उठायचे, दिवसभर चूल, मूल, गाय, गोठा, शेती यांची उस्तवारी करायची आणि मध्यरात्री जमिनीला पाठ लागली तर धन्य मानायचे असा या शेतकरी बायांचा दिनक्रम. या दिनक्रमाने शेतकरी मजूर स्त्रियांना एक मोठी देणगी दिली. संकरित वाणाचे बियाणे तयार करण्यासाठी फुलावर आलेल्या पिकात पुंकेसराचे स्त्रीबीजावर आरोपण करायचे असते. मोठे नाजूक काम; मेहनतीचे व कंटाळवाणेही. थोडी चूक झाली तरी सगळे कष्ट फुकट जातात. या असल्या रटाळ कामामध्ये भारतीय शेतमजूर स्त्री जगविलक्षण कौशल्य दाखवते. संकरित वाणांचे संशोधन परदेशी शास्त्रज्ञ करोत, त्या वाणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात भारत अग्रेसर राहणार आहे.

 बाजारपेठ खुली झाली म्हणजे पिढ्यान्पिढ्या दोष समजले गेलेले एकदम

अन्वयार्थ – दोन / १३६