पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भयानक परिणाम होतील काही सांगता येत नाही' अशी हाकाटी त्यांनी चालू केली आहे; 'असा शेतीमाल खाण्यात आल्याने नेमका कोणता अपाय होणार आहे, त्यातून आताच्या पिढीला धोका काय, पुढच्या पिढीला धोका होण्याचा काय संभव आहे?' यांबाबत निश्चित कोणीच बोलत नाहीत. 'सर्व प्राणिमात्रांच्या जीवनाचे जे रहस्य त्या जनुकांशीच माणसाने ढवळाढवळ चालू केली आहे. त्याचा परिणाम काय होईल कोणी सांगावे? ग्राहकांनी धोका काय म्हणून घ्यावा? जर्मनीत तीसपस्तीस वर्षांपूर्वी थैलिडोमाईड औषध सेवन केल्यामुळे हजारो बालके अपंग जन्मली. जैविक शास्त्रात ढवळाढवळ करून तयार केलेल्या पदार्थांच्या सेवनाने काय होईल कसे सांगावे?' असा साराच घबराट पसरविणाऱ्या अफवांचा सुळसुळाट! जनुकशास्त्राच्या शर्यतीत मागे पडलेल्या युरोपीय कंपन्यांची या साऱ्या चळवळीला काहीच मदत नसावी हे संभव नाही. मुख्यतः अमेरिकेतून येणाऱ्या साऱ्या जनुक-फेरबदल वस्तूंविरुद्ध एकाच घबराटीने मोठा प्रचार चालू झाला आहे. असे पदार्थ आपल्या देशात आणण्याची परवानगी नसावी अशी मागणी सुरू झाली आणि युरोपीय सरकारांनी त्यापुढे मान तुकवली आहे.

 योगायोग असा, की या अमेरिकाविरोधी आंदोलनाचा फायदा भारतातील तेल गाळणाऱ्या उद्योगधंद्याला मिळणार आहे. हिंदुस्थानात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमधील प्रथिनांचे प्रमाण जगात सर्वांत जास्त असते. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या सोयाबीनच्या पेंडीत प्रथिने जास्त असतात. जनावरांची खाद्ये तयार करण्याकरिता भारतातील सोयापेंडीला लोकप्रिय मागणी होती. गेल्या काही वर्षांत मात्र ही मागणी घसरू लागली. तेल गाळणारे उद्योगधंदे झपाट्याने बंद पडू लागले. तेल गिरण्यांवर मोठे आर्थिक अरिष्ट आले होते. आता सोया तेलगिरण्यांना पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत. भारतीय सोयापेंडीला झपाट्याने मागणी वाढणार आहे. कारण, एक, भारतात जैविक फेरबदलाचे सोया बियाणे आलेलेच नाही त्यामुळे जैविक फेरबदलाचा बट्टा अद्याप आपल्या पेंडीवर नाही. दुसरे, गायींच्या पागलपणाच्या आजाराने भयभीत झालेला युरोप आता, दुभत्या जनावरांच्या खाण्यात मांसाहारी पदार्थतर येत नाहीत ना याबद्दल मोठा सचेत झाला आहे. हिंदुस्थानातील पेंडीत मांस व हाडांचा चुरा इत्यादी पदार्थ नसणार याबद्दल सगळ्यांची खात्री आहे. म्हणून, भारतीय सोयापेंडीची युरोपमधील मागणी झपाट्याने वाढणार आहे. आपली कार्यक्षमता किती टिकेल आणि भारतीय निर्यातदार वाहतुकीच्या खर्चात किती कसोशीने कपात करू शकतील यावर ही बाजारपेठ किती भरभराटेल हे अवलंबून आहे.

अन्वयार्थ – दोन / १३५