आर्थिक सुधार, जागतिकीकरण यासंबंधी देशभर चर्चा चालू आहे. त्यात खुलिकरणाची बाजू हिरीरीने मांडणारी प्रमुख आघाडी शेतकरी संघटनेने सांभाळली आहे. याउलट, स्वदेशी जागरण मंच, राजीव दीक्षित, गुरू मूर्ती अशी मंडळी खुल्या बाजारपेठेच्या व्यवस्थेला कडाडून विरोध करणारी आहेत. त्यांचा देशातील अर्थव्यवस्थेत खुलेपणा आणण्याला विरोध आहेच; पण त्याहीपेक्षा जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियंत्रणाखाली व्यापार खुला झाला तर त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाताहत होईल, परदेशी मालाचे लोट भारतात येऊ लागतील, त्यांच्याशी स्पर्धा करणे शेतकऱ्यांना तर सोडाच, भारतीय कारखानदारांनाही शक्य होणार नाही, देशभर मंदीची लाट येईल, बेकारी वाढेल; बौद्धिक संपदेचा हक्क मान्य केला तर देशात शतकानुशतकांच्या परंपरेने निर्माण झालेली वनस्पतींची मौलिक संपदा परदेशी उद्योजक गिळंकृत करतील असे ते आग्रहाने मांडतात. WTO ही जणू काही एक महाराक्षस आहे आणि तिच्या कचाट्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला वाचविणे हे आपले अवतारकार्य आहे असे मानून ही मंडळी साम्यवादी, संघवादी, गांधीवादी आणि इतर फुटकळ स्वयंसेवी संघटना यांची आघाडी बांधीत आहेत. शेतकरी नेते म्हणविणारी काही मंडळीही त्यांनी हाताशी धरली आहेत आणि आयात झालेला माल बंदरातच नष्ट करून टाकणे, ठिकठिकाणी, खुद्द देशाच्या राजधानीतही मोठमोठे मेळावे, निदर्शने घडवून आणणे असे कार्यक्रम त्यांनी जाहीर केले आहेत.
८ डिसेंबर रोजी बंगळूर येथे देशाच्या यापुढील आर्थिक धोरणासंबंधी एक परिसंवाद होता. शेतीसंबंधीच्या सत्राचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. उद्घाटनाच्या सत्रात मी उपस्थित राहू शकलो नाही. त्या सत्रात श्री. गुरुमूर्ती, इंदिरा काँग्रेसचे श्री. रमेश जयराम आणि नागालँण्डपासून सौराष्ट्रापर्यंत पसरलेल्या अनेक स्वयंसेवी