पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणून भाषणबाजी करण्याची साथ, लोकसभेच्या चालू सत्रात स्थगन प्रस्ताव आणला गेला तेव्हापासून लागली आहे. लोकसभेत खासदार बोलले, लोकसभेच्या बाहेर विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर आणि देवेगौडा! या तीन माजी पंतप्रधानांनी हजारपाचशे शेतकऱ्यांचा मेळावा घेतला आणि एवढ्या अफाट जनसमुदायासमोर सरकार कोणत्याही पक्षाचे असो, शेतकऱ्यांना न्याय मिळणे शक्य नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी आता आपलाच झेंडा उभारावा आणि स्वतंत्र नेतृत्व उभे करून WTOच्या संकटाला सामोरे जावे, असे आवाहन केले.
 चंडीगडच्या कार्यक्रमात प्रकाशसिंग बादल आणि चौताला यांनी हाच तराणा चालू ठेवला. केंद्रातील राज्यकर्त्या आघाडीचा अकाली दल हाही घटकपक्ष आहे आणि हरियाना विकास पार्टी हाही. या दोघांनी विरोधी पक्षांच्या सुरांत सूर मिसळून गळा काढावा हे तसे पाहता तसे विचित्रच राजकारण! पण सद्य:स्थितीत कोण काय राजकीय भूमिका घेईल याचा अंदाज करणे दुरापास्तच आहे.
 कुस्तीतील पहिलवान बरोबरीचे असले पाहिजे, असा आग्रह धरणारे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल अकाली दलाचे म्हणजे शिख पंथाच्या आघाडीचेही नेते आहेत. शिख पंथाचा सारा इतिहास पाहिला तर, सर्व गुरूंच्या काळात लढाया झाल्या त्या जबरदस्त मोगल ताकदीशी. 'मोगल सत्ता केवढी प्रबळ, त्यांच्याशी सामना कसा करावा?' असा प्रश्न कोणा शिख गुरूने केला नाही. 'धर्म आणि सत्य यांकरिता लढायचे आहे; लढता लढता मरण आले तर ते श्रेयस्कर' अशा हौतात्म्याच्या भावनेने शिख लढले. मी तर ससाण्यांच्या विरुद्ध कबुतरे लढाईसाठी पाठवीत आहे अशी गुरू गोविंदसिंग यांची उक्ती प्रसिद्ध आहे. शिख संग्रामाचा सारा देदीप्यमान इतिहास घडला त्या वेळी सध्याच्या अकाली दलाचे नेते नव्हते ही भाग्याची गोष्ट म्हणायची!
 शिख लढवय्यांच्या माथी शेवटी हौतात्म्यच अधिक आले. यापुढच्या लढाया जिंकण्याची महात्वाकांक्षा ठेवली पाहिजे असा त्यांचा विचार असेल तर त्यांनी रणनीती बदलण्याचा विचार करावा हे योग्य. 'मोगल फौजेशी लढताना सरळ सरळ झुंज देण्याची रणनीती सोडून महाराष्ट्रातील मावळ्यांनी जी गनिमी काव्याची पद्धत वापरली ती स्वीकारावी; पण जुलुमाशी टक्कर जराही कच न खाता द्यावी' असे अकाली नेत्यांनी म्हटले असते तर ते भूषणावह झाले असते. 'सामनेवाला बरोबरीचा द्या' असा लाडीक आग्रह धरणारांना 'अकाली' म्हणावे तरी कसे?

 पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची ही स्थिती. हरियानाचे मुख्यमंत्री चौधरी चौताला यांची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. चौधरी देवीलाल यांचे ते सुपुत्र.

अन्वयार्थ – दोन / १२६