पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करून परदेशी मालाचा लोंढा बेबंदपणे येऊ दिला आहे.' वक्त्यामागून वक्ते तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा घोकत होते; पाचसहा रूपये लिटरने दुधाची आयात होत असल्याच्या बाजारू वावड्या, खातरजमा न करताच, उडवीत होते. सोनिया गांधींच्या पक्षांचे सदस्य, साहजिकच, हमी देत होते. की 'आम्हाला सत्तेवर येऊ द्या, की मग बघा आम्ही कसे आयातशुल्क वाढवतो आणि देशी बाजारपेठेतून आयात माल महाग बनवून कसे हद्दपार करतो ते.' आयातशुल्क वाढविल्याने देशी बाजारपेठेवर काय परिणाम होतील हे समजणे काही शेलक्या खासदारांच्या मुळातच आवाक्याबाहेरचे आहे. आयातशुल्काच्या भिंती उंचावून 'शेजाऱ्याला भिकारी करा' धोरणामुळे होणाऱ्या गुंत्याचे आकलन त्यांना व्हावे अशी अपेक्षा करणे चुकीचेच आहे. चढ्या आयातशुल्कामुळे ग्राहकांपुढे काय वाढून ठेवले जाईल याची पारख त्यांना व्हावी अशी अपेक्षा करणे दूरच. काही शेलके राजकारणी प्रेक्षक सज्जाला गुंगविण्याच्या कलेत मोठे वाकबगार असतात. कांद्याच्या किंमती वाढायला लागल्या, की ते ग्राहकांचे तारणहार बनतात आणि शेतीमालाच्या किमती पडू लागल्या, की शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेल्या शिलेदाराचे सोंग वठवायला त्यांना आवडते.
 कृषिमंत्री नितीशकुमारांनी चर्चेला दिलेले उत्तर संसदीय वितंडवादाचा उत्कृष्ट नमुनाच ठरावे. मुळातच, शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला जागतिक व्यापार संघटना आणि जागतिकीकरण कारणीभूत आहेत का? असतील तर असतील! पण, कृपा करून सांगा, ही 'जागतिक व्यापार संघटना' आम्हाला बहाल कोणी केली? मराकेशमध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर या काँग्रेसनेच सह्या केल्या ना? आणि आयातशुल्काच्या अपर्याप्त मर्यादा त्यांनीच आखून घेतल्या ना? या आयातशुल्कांची अंमलबजावणी कोणी सुरू केली? राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नक्कीच नाही! जे आता नक्राश्रू गाळीत आहेत त्यांच्या काँग्रेसनेच हे सुरू केले ना? विरोधकांच्या युक्तिवादाचा असा धुव्वा उडवल्यानंतर मात्र कृषिमंत्रयांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले, की एकदोन महिन्यांनी सुरू होणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघाटींत आयातशुल्काची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव हिंदुस्तान सरकार मांडील." आपण शेतकऱ्यांच्या हिताचा युक्तिवाद मांडीत आहोत असेच ते समजत होते.

 हा 'शेतकरी महोत्सव' काही संसद सभागृहाच्या आवारापुरताच मर्यादित नव्हता. संसदेत हे नाटक चालू असतानाच संसद सभागृहापासून हाकेच्या अंतरावर तीन माजी पंतप्रधान - विश्वनाथ प्रताप सिंग, देवेगौडा आणि चंद्रशेखर

अन्वयार्थ – दोन / १२२