आहे. त्याने आता धर्मभावना आणि राष्ट्रवाद यांची त्यांच्या पक्षाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून दीर्घकाळपर्यन्त आपले मतदारसंघ शाबूत रहातील याची व्यवस्था करण्याचे योजले आहे. हे असले शिक्षणक्रम स्वीकारले गेले तर दहावीपर्यन्तच काय, अगदी शेवटपर्यन्त कोणत्याच परीक्षांचे कोणतेच प्रयोजन राहणार नाही. धर्मभावना आणि राष्ट्रप्रेम शाळेत प्रवेश करण्याआधीही एखाद्या संस्कारित विद्यार्थ्याच्या मनात प्रचंड चेतलेले असतील तर, दहावीपर्यन्त एक दशक धर्मतत्त्वांचे आणि राष्ट्रवादाचे धडे घोकलेल्या विद्यार्थ्याच्या मनात त्यांची शिकवण स्पर्शही करू शकलेली नसेल ही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, परीक्षांचे काही कामच राहत नाही. शिक्षणच अशिक्षण झाले तर परीक्षा घ्यायचीच कशाची? एका बाजूला पंतप्रधान 'जय विज्ञान' अशी घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातील कठमुल्ले विज्ञानविरोधी धोरणे राबवतात, त्याबद्दल पंतप्रधान काहीही करू शकत नाहीत. एवढेच रजपूतप्रणित 'मुरली मनोहर जोशी शिक्षणधोरणा'चे तात्पर्य!
दि. २३/११/२०००
■ ■