पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकदा भगवान श्रीकृष्णांना नारदाने पारिजातकाचे फूल दिले. ते भगवंतांनी रुक्मिणीला दिले. त्याच्या सुगंधाने सारी द्वारिका नगरी भरून गेली आणि सर्वत्र चर्चेचा विषय झाला – रुक्मिणीच कृष्णाची लाडकी राणी'. चर्चा सत्यभामेच्या कानी गेली आणि तिने मोठा आक्रोश मांडला. कृष्णाने तिची समजूत काढली. या विषयावर वामनपंडितांनी मोठे बहारदार काव्य लिहिले आहे. 'नारदाने फूल अर्पण केले त्याबरोबर पहिला विचार मनांत आला तो हा की, हा वृक्ष आपल्या राजधानीत पाहिजे आणि तोदेखील आपल्या घरीच असावा. त्यातले त्यात प्रिय राणीच्या सदनात असणे उत्तम. रुक्मिणीला मी फूल दिले, पण अख्खा वृक्षच तुझ्या अंगणात लावण्यासाठी आणावा असे मी ठरविले आहे,' अशी कृष्णाने बतावणी केली. भामा रुसली, रागही खोटा आणि समजूतही खोटी. आपल्याला फूलच दिले आणि भामेला पारिजात वृक्ष दिला, हे समजल्यावर रुक्मिणीने काही थैमान घातले किंवा कसे याची काही नोंद महाभारतात नाही.
 युग बदलले. काळ बदलला. राजेशाही गेली. लोकशाही आली. निश्चित बहुमताचा आधार असलेले पक्ष आणि पंतप्रधान गेले. मोर्चा आणि आघाड्या यांची सरकारे येऊ लागली आणि 'कोपागारां'चा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रकट झाला! सत्तावीस पक्षांची आघाडी, अर्धशतकावर मंत्री या सगळ्यांना सांभाळून राज्य करणे म्हणजे सोळा सहस्त्र नारींच्या अनुराधनापेक्षाही कठीण.

 आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या किंमती भडकल्या. सरकारी तिजोरीत आधीच खडखडाट. महागात तेल विकत घेऊन ग्राहकांना स्वस्तात देण्याचा 'अव्यापारेषु व्यापार' किती दिवस चालावा? पर्याय नाही म्हणून अखेरीस पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला. पेट्रोलचे भाव वाढवण्याचा निषेध म्हणून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि रेल्वे मंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी फटकन् राजीनामा देऊन टाकला. राजकीय तणाव एकदम वाढला. ताईंनी मोठे आकांडतांडव मांडले. गरीबांना जिणे असह्य करणारी ही भाववाढ आघाडीतील पक्षांशी औपचारिक विचारविनिमयसुद्धा न करता केली. आम्ही आता कोणत्या तोंडाने लोकांसमोर जावे? महागाई भडकावणाऱ्या सरकारमध्ये मंत्री म्हणून राहणे म्हणजे राजकीय आत्महत्याच आहे. नको ही राष्ट्रीय आघाडी, नको ते मंत्रीपद. असा मोठा त्रागा त्यांनी केला.

अन्वयार्थ – दोन / १०४