पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






ब्रह्मचाऱ्याचा कोपागार अनुनय


 कुटुंबकलहाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि वेगवेगळ्या छटा यांच्याबाबत मराठी साहित्यिकांनी उदंड लिखाण केले आहे. किंबहुना, पती-पत्नीमधील भांडण हा मराठी साहित्यातील एक विशेष अलंकार आहे. साहित्यिक मध्यमवर्गीय, त्यामुळे, वर्णनेही मध्यमवर्गातील कलहांची. आपला जोडीदार नाराज आहे हे कळून येईपर्यन्त या कलहनाट्याचा पहिला अंक संपतो. रागाने तापलेला चेहरा, जोरजोराचा श्वासोच्छ्वास, हालचालींतील सहेतुक जडपणा, आपण काही बोलत नाही म्हणजे जगातील सहनशीलतेचे सारे उच्चांक मोडीत आहोत असा आविर्भाव, भांड्यांची आदळआपट, पोरांना बदडणे इ.इ. प्रवेशांती हा अंक संपतो.

 पूर्वीच्या राजेरजवाड्यांना मोठा जनानखाना असे. एवढ्या सगळया पत्नीजनांत आज नाराज कोण आहे, हे समजून येणे अशक्य, समजले तरी त्याची फारशी पर्वा करण्याची त्याकाळी पद्धत नव्हती. जिच्या सदनी जाण्याची राजाने इच्छा धरावी तीच रुसलेली असली तरच रुसवा काढण्याचा प्रश्न निर्माण होणार. जाण्याआधी सदनातील रागरंग कसा आहे, हे कळण्याला काहीच मार्ग नाही. त्यासाठी एक सुंदर उपाय योजलेला असे. राजाच्या महालात अनेक सदने आणि आगारे असत. ज्या त्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या स्थानाप्रमाणे निवासाची व्यवस्था असे. खास प्रियजनांसाठी तर हिवाळ्यातील निवास वेगळा, उन्हाळ्यातील वेगळा, पावसाळ्यातील वेगळा असा थाट असे. या सगळ्या वेगवेगळ्या विभागांत कोपागार म्हणून एक वेगळा स्वतंत्र महाल असे. कोणीही राणी नाराज झाली की तिने उठावे आणि कोपागारात जाऊन बसावे म्हणजे राजेश्वरांना दूताकरवी तातडीने बातमी कळे की, अमूक अमूक राणी रुसली आहे. महत्त्वाचे वाटले तर राजा अशा प्रकरणी लक्ष घाली, अन्यथा कोपागरात राहून राहून विटली म्हणजे ती राणी सुजल्या डोळ्यांनी आपल्या निवासात परते.

अन्वयार्थ – दोन / १०३