मी म्हटले, "मुंबईची आजची परिस्थिती पाहून मला १९७२ सालच्या बेरुत शहराची आठवण येते. ख्रिस्ती, मुसलमान, फ्रेंच, अमेरिकन, इंग्लिश अनेक जातीजमातींचे लोक तेथे गोडगुलाबीने राहत. सर्व मध्य-पूर्वेत आर्थिक भरभराट आणि जातीय सलोख्याचा आदर्श. १९७२ मध्ये तेथे जातीय दंगली चालू झाल्या आणि तीन वर्षांत बेरुतचे सारे जीवन ठप्प झाले. आज तर सारे बेरुत जवळजवळ बेचिराख झाले आहे. बंद आणि दंगली अशाच चालू राहिल्या तर मुंबई वर्षात बेरुत होऊन जाईल."
खंडणी वसुली
आमच्या गप्पा चालू असताना कारखान्याच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने येऊन काही निरोप दिला. चिठ्ठी पाहिल्यावर आमच्या मित्राच्या चेहऱ्यावर जे भाव उठले, त्याचे वर्णन करणे कठीण आहे. राग, चीड, तुच्छता इत्यादींचे मिश्रण पाहून मी चकित झालो. मनात म्हटले, हा माणूस कारखानदार व्हायच्या ऐवजी नाटकात, सिनेमात गेला असता तर उत्कृष्ट अभिव्यक्तीबद्दल नाव कमावून गेला असता.
केवळ कुतूहलापोटी मी विचारलो, "काय झाले काय?"
"काही विशेष नाही. नेहमीचेच."
"कोणी देणेदार आलाय का?"
"देणेदारापेक्षा वाईट, इन्स्पेक्टर आलाय."
माझ्याशी बोलणे थांबवून त्याने खिशातून १०० रु. च्या पाच नोटा काढल्या आणि इन्स्पेक्टरला देण्यासाठी कर्मचाऱ्याच्या हाती दिल्या.
माझ्याकडे पाहुणे आल्यामुळे त्यांना भेटता येत नाही म्हणून सांग. न राहवल्याने मी विचारले, "ही काय लाच वगैरे आहे की काय?"
कारखानदार मित्र म्हणाले, "काय म्हणायचे ते म्हणा; वेगवेगळ्या डझनभर खात्यांचे इन्स्पेक्टर आठवडाभर येत असतात आणि प्रत्येकाची अपेक्षा प्रत्येक भेटीच्या वेळी प्रत्येक कारखान्यात त्यांना ५०० रु. मिळावे अशी असते. नोकरदार वर्गाने कारखानदार वर्गावर बसवलेली ही 'खंडणी' आहे असे आम्ही मानतो."
इन्स्पेक्टरसाहेबांचा इंगा
"बाकीच्या कारखानदारांची लफडी असतात. भानगडी असतात. ते अधिकाऱ्यांना खुश ठेवू पाहतात हे समजण्यासारखे आहे; पण तुमच्यासारख्या केवळ बुद्धीचे भांडवल करणाऱ्यांवर अशी वेळ का येते?" मी विचारले.
पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/49
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अन्वयार्थ - एक / ५०