पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





आणखी एक स्वायत्तता लिमिटेड


 पुण्याजवळच्या एका उद्योग वसाहतीत गेली कित्येक वर्षे कारखाना चालवणाऱ्या एका उद्योजकाची गाठ पडली. कारखाना छोटासाच, फार अवजड यंत्रसामग्री आहे असे नाही. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून नागरिकांनाच नव्हे तर देशाच्या संरक्षणाकरितासुद्धा आवश्यक असा माल हे तरुण कारखानदार बनवतात. कारखान्याची इमारतही सुबक लहानसर. कारखान्यातील मुख्य भांडवलाची गुंतवणूक म्हणजे, या कारखानदार मित्रांचे इलेक्ट्रॉनिकमधील विशेष ज्ञान.
 मुंबईचे बेरुत होणार
 मुंबईतील दंगलीच्या बातम्यांनी वर्तमानपत्रे भरलेली होती. कारखानदार मित्रांनी मला विचारले, "या दंगली अशाच चालू राहिल्या तर देशाचे काय होईल?" मी म्हटले, "गेल्या १० दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील फळबाग शेती जवळजवळ उद्ध्वस्त झाली आहे. द्राक्षे १० रुपयांच्या खाली आली, बोरं १.५० ते २ रु. किलो झाली. वाहतूक बंद, मुंबई बाजार बंद, या फटक्यातून शेतकऱ्याला सावरायला किती वर्षे लागतील कुणास ठाऊक? कारखानदारांवर काय परिणाम होईल. माझ्यापेक्षा तुम्हीच चांगले जाणता."
 कारखानदार महाशयांनी मला एक हकिकत सांगितली, "एक अनिवासी भारतीय परदेशात इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातच नाव कमावलेला. भारतामध्ये काही दिवसांपूर्वीच त्याने १०० कोटी रुपयाची गुंतवणूक केली आणि मुंबईचे दंगे चालू झाले. आता तो घायकुतीला आला आहे. त्याची गडबड अशी चालू आहे, की हे भांडवल हिंदुस्थानातून परत काढून न्यावे. अशा अशांततेच्या आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत कारखानदारी चालायची कशी, ही कारखानदार मित्राची चिंता."

अन्वयार्थ - एक / ४९