पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/277

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हिरवी शेती, देणग्यांचा पूर
 अण्णासाहेबांनी राळेगण शिंदीस काय दिलेय निव्वळ कोरडवाहू गाव. पाऊसमानही बेताचेच पण जो काही पाऊस पडतो तो वेगवेगळ्या पद्धतीने साठवून आणि जमिनीत जिरवून शेतीला पाण्याचा आधार देण्याचा सामूहिक कार्यक्रम अण्णासाहेबांनी राबवला. ओसाड जागी पिके दिसू लागली. शेती हिरवीगार दिसली, की संपन्नता आली असा शहरवासीयांचा समज होतो. साहजिकच राळेगण शिंदी गावात स्वर्ग अवतरला असा गवगवा झाली. गाव दिसतेही बऱ्यापैकी सुखवस्तू. अण्णासाहेबांच्या तेजोवलयामुळे गावात ओतला जाणारा विविध निधींचा प्रवाह नसता तर काय झाले असते, सांगणे कठीण आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर सरकार उणे ७० टक्के सबसिडी लादते हे 'डंकेल प्रस्तावा'च्या संबंधात जगजाहीर झाल्यानंतर एक एक गावाची सुधारणा आणि उद्धार करण्याची कल्पना किनकालात निघाली आहे.
 रुपया-पैशाचा हिशेब बाजूला ठेवला तरी राळेगण शिंदी हिरवे करण्याचा चमत्कार बाकी राहतोच. अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव नसला तर हा प्रयोग किती दिवस टिकेल? ७२ सालासारखा दुष्काळ पुन्हा आला तर इतर गावांच्या तुलनेने राळेगण शिंदी दोन तीन महिने तरी अधिक टिकाव धरील काय? राळेगण शिंदीसारखाच प्रयोग करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती असलेली गावे किती? त्यात राळेगण शिंदीच्या नमुन्याबरहुकूम काम उभे राहू शकेल काय? हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत; पण महात्म्यांच्या अवतार कार्यात असल्या प्रश्नांना महत्त्व नसते. एका गावातील का होईना लोकांमध्ये त्यांनी चैतन्य उभे केले आणि जगभरच्या ग्रामोद्धार करू पाहणाऱ्या लोकांची मथुरा-काशी नगर जिल्ह्यातील छोट्याशा दुष्काळी गावात अवतरली हे कोणाला नाकारता येणार नाही.
 अण्णांचा सात्त्विक क्रोध
 अण्णासाहेबांच्या कामाचा एक सामाजिक भागही होता. गावात त्यांनी दारूबंदी जाहीर केली. दारू पिणाऱ्या माणसाला खांबाला बांधून थोबाडून काढण्यास हा महात्मा कचरत नसे. लोकांच्या नैतिकतेची अण्णासाहेबांना इतकी चिंता, की गावातील दूरदर्शनवर छायागीत पाहण्याचीसुद्धा बंदी अण्णासाहेबांनी घातली होती. बंदी उघडपणे मोडलेली तरी कोठे दिसत नसे.

 अण्णा लष्करी जवान; पण वेशभूषा साने गुरुजींच्या पद्धतीची. चेहऱ्यावरील मुद्रा अगदी शालीन सौजन्याची. त्यात ग्रामोद्धाराच्या कामाची जोड. साहजिकच

अन्वयार्थ - एक / २७८