पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'भव शून्य नादे' या कथेमध्ये देशमुख देतात. त्यांच्या प्रज्ञा - प्रतिभेचा सुंदर मिलाफ या कथेत झाला आहे. मानवी मनाला मृत्यूचे तत्त्वज्ञान नेहमीच मोहित करीत आले आहे. आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञानात तर ती मोहिनी भवसागरात तरून जायला पुरेशी आहे.
 परभणीच्या तामुलवाडीला नेहमीच पुराने वेढलेले असते. कित्येक वर्षांची समस्या सुटलेली नव्हतीच. प्रखर इच्छाशक्तीचा अभाव! अक्षयसारखा ध्येय घेऊन आलेला सरकारी अभियंता तामुलवाडीला येतो. तेथील नैसर्गिक अवकृपेने दीर्णविदीर्ण होतो. या परिस्थितीचा एकच उ:शाप म्हणजे 'शिवशंभो हर हर शिवशंभो!' मोरया गोसावी. निर्मम, निरागस आणि नि:स्पृह योगी - भवशून्यात आत्मानुभूतीचा प्रकाश देतो. तेवढेच मरण सुसह्य करतो. राजकारणी व अधिकाऱ्यांची भावनाशून्यता, अस्मानी सुलतानाची चोहोबाजूंनी प्रतिकूलता यांचे भयानक तांडव 'भव शून्य नादे' मध्ये दिसते. गाव पुराने वेढले जाऊन संपर्क तुटतो. बाळंत-वेदना सहन करण्यासाठी तंबाखूची गोळी भरविली जाते!
 अधिकारी येतात नि अधिकारी जातात. व्यवस्थेची पोलादी चौकट तोडू न शकणारा अक्षयही नोकरी सोडून मुंबईला जातो. मोरया गोसावी जलसमाधी घेतात आणि मास्तरांच्या अडलेल्या लेकीच्या पोटी मोरया म्हणून जन्म घेतात. परंपरेच्या समजातून कथाकारांनी फार मोठे सूचन केले आहे. व्यवस्था बदलणार नाही. मोरया गोसावीसारखे निर्भिक सज्जन जगण्याला बळ देतात. भारतीय व्यवस्थेत हा सनातन संघर्ष तर नसावा ना? अशी शंका कथेच्या अखेरीस उत्पन्न होते.
 'नेव्हर सी यू अगेन', 'स्वत:ला रचित गेलो', 'बच्चू', 'सर्वात कठीण काम', 'नशिबाचा खेळ' या कथांची प्रेरणा अनाथपण आहे. बाल्य वात्सल्योत्सुक राहिले तर मन कसे उद्ध्वस्त होते याचे दिग्दर्शन करणाऱ्या या कथा आहेत. मुरलीधर व राधाक्का हे देसाई पती-पत्नी आपला संजय मुलगा बेंगरूळ - कुरूप आहे म्हणून त्याचा दुस्वास राहतात, तिरस्कार करतात.
 आपल्या संपूर्ण घराण्यात हा असा कुरूप निपजला म्हणून! शेजारची बन्सी त्याला आपल्या उफाड्याने आमंत्रित करते; पण वडील आल्याने ही त्याच्यावर उलटते. देसाई पती-पत्नीला मुळातच तिरस्कृत वाटणारं हे कुरूप रूप. त्याला बेदम मारून डांबून ठेवतात आठ दिवस. ग्लानीतल्या संजयला सिस्टर अग्नेस ममतेने कवटाळतात. संजय मोठा चित्रकार होतो. जन्म न देणाऱ्या सिस्टर अग्नेस संजयच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित नसतात. विमान अपघात तिचा दुसराही मुलगा, सून, नातू मृत्यूमुखी पडतात. उद्ध्वस्त झालेल्या अग्नेसला संजय मातृपद देतो. आईबापांना 'नेव्हर सी यू अगेन' असे सांगतो. त्याला जन्मभराचे वात्सल्य सिस्टर

अन्वयार्थ ४५