पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि श्री डॉक्टर झाल्यावर सर्व स्थिरस्थावर झाल्यावर कामभावना उत्पन्न झाली तेव्हा तिचे ती दमन करते. आणि तिच्यामध्ये भावगंड निर्माण होतो. तरुणपणात पुरुषसंग सोडलेल्या स्त्रीला आता प्रौढपणी, वृद्धत्वाकडे झकुताना ‘साहचार आठवल्याने' ती भ्रम झाल्याप्रमाणे वागते. “मी बाई आपली साधीसुधी, जुन्या बाळबोध वळणाची आहे. माझं पाऊल वाकडं पडणं शक्य आहे? मास्तर सारखं माझ्याकडं पाहतात, त्यांची नजर पापी आहे. ती माझा पाठलाग करते रे. मला भीती वाटते श्री!" श्रीची आई हे बोलते तेव्हा श्रीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. खरे तर बऱ्याच दिवसांपासून मनात दडून राहिलेली शिरीशिरी उफाळून येते; परंतु ती त्या भावनेचे अस्तित्व नाकारते आणि मनाच्या बेसावध अवस्थेमध्ये भयगंडासारखे वाटू लागले. लैंगिक सुखाची ओढ समजून उमजूनही ती नाकारते. मुलगा ही गोष्ट समजून घेतो आणि आईला शॉक ट्रिटमेंट देऊन घेतो. तिच्या मनातील वासनेचा निचरा होतो. 'ब्रदर्स फिक्सेशन' कथेत बहिणीला भावाची आंतरिक ओढ आहे. खेळाडू असणाऱ्या नवऱ्याला महत्त्व न देता आपल्या भावाचे कौतुक बहीण करते. दोघेही क्रिकेटर; मात्र ती भावाच्या ठिकाणीच पुरुष बघते आणि त्याच्याशी नवऱ्याची तुलना करू लागते. नवऱ्याची विकीची डबल सेंचुरी हुकलेली असताना त्याचे तिला - स्विटीला - काहीच वाटत नाही. परंतु भावाचे कॅलेंडर इयरमधील रेकॉर्ड हुकल्याचे तिला वाईट वाटते. भावाचीही बहिणीविषयीची - स्विटीची - ओढ आहेच. बहीण आपल्या नजरेसमोरच राहावी, तिला हवे तेव्हा भेटता यावे म्हणून तो बहिणीला आपल्या क्रिकेटर मित्राला देतो. त्याच्याशी तिचा विवाह झाल्याने त्याची समस्या सुटते. कुठल्याही देशात गेल्यानंतर तो बहिणीसाठी खरेदी करीत असतोच. विकी म्हणतोसुद्धा, "अरे भाई, आता ती माझी पत्नी आहे मी आहे ना, तिची हौस पुरवायला." तो शेवटी या नात्याला 'ब्रदर्स फिक्सेशन' असे नाव देतो.
 सौंदर्याच्या ओढी, सुप्तावस्थेमधील सेक्स, सृजनाचा साक्षात्कार या अंतरीच्या गूढगर्भातील विशेष गोष्टी होय. 'राधा', 'जोकर', 'सृजन कसा तडफड करी!', 'मर्सी किलिंग' या कथांमध्ये सृजनाची निर्मिती प्रक्रिया प्रतिबिंबित झाली आहे. पु. शि. रेगे हे आत्मनिमग्न कवी. रेग्यांनी प्रेमभावना व वासना या गोष्टींना व्यक्तिवाची रूपातून काढून वैश्विक, चिरंतन असे भावरूप काव्यातून प्रकट केले आहे. रेग्यांची 'राधा', त्रिधा राधा, 'बुंथी', 'चापेचिया पिवळा पवळण.....' या कविता प्रेमभावनेच्या नितांतसुंदर आवाहक स्वरूपाच्या आहेत. राधा-कृष्ण यांचा प्रेमविषय भारतीय मनाला आवडता विषय आहे. ते लोभस मिथक भारतातील अनेक कलावंतांनी उचललेले आहे. राधा-कृष्ण हे एकरूप, निरपेक्ष प्रेम कवितेत जसे प्रकटलेले दिसते तसे ते कथेमधून, लघुपट, काव्यातून घेणे म्हणजे कलेचे प्रकारांतरण होय. कलेला

३२ 0 अन्वयार्थ