कथानके आहेत. 'हे असे घडले' असे रंजकतेने सांगून टाकून पुढे वाचकाला अंतर्मुख करणारे, विचार करायला लावणारे असे एक किंवा दोनच प्रश्न मांडले आहेत. या कथानकांमधून गेल्या पंचवीस तीस वर्षात प्रशासनातील व त्याहीपेक्षा राजकारणातील मूल्ये कशी कशी बदलत गेली ते कळून येते. नव्याने प्रशासकीय करियरमध्ये येऊन इच्छिणाऱ्यांना एक इशारा मिळतो व सोबत एक आव्हानही मिळते. पहिलेच कथानक एका इंजिनियरला आमदाराचे कार्यकर्ते मारहाण करतात. उपजिल्हाधिकारी पोलिस आणि तहसीलदार सर्व मिळून कारवाई करतात ती कायद्याच्या चौकटीप्रमाणेच. मात्र त्यांनी कारवाई मागे घ्यावी म्हणून आलेले दडपण, बदलीची धमकी आणि या तणावाखाली उपजिल्हाधिकारी वावरत असतानाच तिकडे इंजिनियरने मात्र तडजोङ मान्य केलेली असते; कारण तसे न केल्याने आमदार आपली कुलंगडी बाहेर काढेल ही भीती. पाप कुणाचे ताप कुणाला- असा शेराही हसत हसत मारला आहे, पण ते उपजिल्हाधिकारी जे करत होता ते निव्वळ इंजिनियरला झालेल्या मारहाणीपुरतेच होते? की ते प्रशासनाची भविष्यकालीन मोठी दुर्दशा रोखण्याकरीता होते? सुज्ञ वाचक हा सारासार विचार करतो आणि माघार न घेण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाशी सहमत होतो.
दुसरे पुस्तक 'प्रशासनाची बखर' हे मात्र कथनाकात्मक नसून अत्यंत चिकित्सक, विश्लेषणात्मक तरीही रंजकतेने लिहिले आहे. हे सुंदरसे टेक्स्ट बुकच आहे म्हणा ना! पण विषय रटाळ न होऊ देता लिहिलेले. खूपसे थिअरेटिकल, संपूर्ण विवेचन भारतीय पृष्ठभूमीच्या अंगाने केलेले आढळते. म्हणून ते चटकन लक्षात येते, पटते आणि त्या विषयाची गोडी निर्माण होते. अगदी मोगलकालीन ते शिवकालीन ते बिटिश राजवटीमधील प्रशासन पद्धती काय होती इथपर्यंत लेखकाने आढावा घेतला आहे. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश गेले, लोकशाही आली, त्यामुळे राज्यकारभाराबाबत दिशा आणि धोरणे ठरवणारी यंत्रणा बदलली. त्यांची विचारसरणी आणि वागणूक बदलली. प्रशासन यंत्रणा मात्र तीच राहिली. कायदेकानूही तेच राहिले. मग हळूहळू विसंवाद निर्माण होऊ लागले. या सर्वांना परिणाम काय झाला ते देशमुखांनी “फॉल अॅण्ड फॉल्स ऑफ इंडियन ब्यूरोक्रसी' या भागात मांडले आहे. तत्पूर्वी स्वातंत्र्योत्तर साठ वर्षाच्या काळातील बदलांना समजून घेण्यासाठी त्यांनी मॅनेजमेंटच्या पुस्तकांत प्रसिद्ध असलेले “सिक्स थिंकिंग हॅट्स" चे प्रतीक वापरून भारतीय प्रशासनातील किती मंडळी कोणत्या प्रसंगी कोणती हॅट वापरत होती. म्हणजेच कोणत्या मनस्थितीने काम करत होती त्याचाही आढावा घेतला आहे. या सर्वच भागांमध्ये मूळ सिद्धान्तांचे विवेचन विस्ताराने पण रंजकतेने केले आहे. "प्रशासन' चा सिद्धान्त काय, भारतीय प्रशासक कसा वागतो, तसा