पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिणाम होऊ शकतो. अशा कारखान्यांतील यंत्रसामुग्री अखंड सुरू असते आणि ती चालविण्यासाठी तेथे कर्मचाऱ्यांची उपस्थिती अखंड असावी लागते. याचाच अर्थ कारखान्याचे वेळापत्रक त्यात तयार होणाऱ्या पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून ठेवावं लागतं. यालाच कामाचं तर्कशास्त्र असंं म्हणतात.
 याउलट कर्मचाऱ्यांच तर्कशास्त्र असतं.बहुुतेक कर्मचाऱ्यांना बालपणापासून रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत झोपण्याची, तसेच कुटुंबीय व मित्रमंडळ यांच्यासमवेेत सण उत्सव साजरे करण्याची सवय लागलेली असते.आज आपण ज्यावेळी गाढ झोपेेत आहोत त्याच वेळी पुढे आपल्याला काम करावे लागणार आहे याची जाणीवही कुणाला होत नाही. मात्र तशी वेळ आल्यावर तर्कशास्त्राशी जुळवून घेणे कर्मचाऱ्याला भाग पडते आणि या दोन तर्कशास्त्रांमध्ये संघर्षही घडू शकतो.
 कामाचं तर्कशास्त्र व कर्मचाऱ्यांचं तर्कशास्त्र केवळ काम करण्याच्या वेळेवर अवलंबून असतं असं नाही.तर कामाची जागा, स्वरूप आणि पध्दतीचाही त्यावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ लोखंड वितळविण्यांची भट्टी चालवणाच्या कर्मचाऱ्याला सतत आगीच्या धगीत काम करावं लागतं. अणुऊर्जा केंद्रात करणाऱ्या शास्त्रज्ञाला किंवा तंत्रज्ञाला घातक अशा किरणोत्सर्गी वातावरणात काम करावे लागत.खत,दारूगोळा,तेलशुध्दीकरण केंद्रे, इत्यादी ठिकाणी कामे करणाऱ्या अभियंत्यांना प्रदूषणयुक्त वातावरणाचा सामना करावा लागतो. पोलीस, लष्कर,अग्निशामक दल आदी सेवांमध्ये असणाऱ्यांना तर जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, तर काही जणाना सुबक व निर्धोक जागी काम करण्याची संधी मिळते.
 कर्मचारी बर्याचदा कामाच्या तर्कशास्त्राशी स्वतःला नाईलाजास्तव जुळवून घेतात.तथापि,कामाचं स्वरूप व कर्मचाऱ्यांची मानसिकता यांचा सांधा जुळला नाही तर कर्मचारी मनातल्या मनात कुढत राहतो.कामात त्याचं मन लागत नाही.याचा त्याच्या कामगिरीवर अपरिहार्यपणे परिणाम होतो. परिणामी उद्योगाचं नुकसान होतं.त्यामुळे कामाचं तर्कशास्त्र आणि कर्मचाऱ्याचं तर्कशास्त्र यांचा मेळ बसविणं हे व्यवस्थापनाला स्वीकारावं लागतं.

कर्मचाऱ्यांचे प्रबोधन :
 हा मेळ बसविण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मानसिकतेविषयी व कामाच्या स्वरूपाविषयी प्रबोधन करणे हा होय.आपल्या कामाची वेळ, स्थान किवा वातावरण आदर्श नसलं तरी आपलं काम महत्त्वाचे आहे.आपल्या आर्थिक प्राप्तीकरताच हे काम करावे लागत आहे असं नाही तर ती आपली सामाजिक जबाबदारी आहे.आपण थोडी कळ सोसून ते केलं नाही तर उद्योग व्यवस्थेचेच नुकसान होणार आहे, ही भावना

तर्कशास्त्र:कामाचे, कर्मचाऱ्यांचे/९०