पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 महाकवी तुलसीदासाने म्हटलं आहे, ‘कोहू को राजा, हमै का हानी' (राजा कोणीही असो, आम्हाला काय त्याचे) ही अवस्था शतकानुशतके कोणताही बदल न होता चालत राहिली. समाजव्यवस्था कासवाप्रमाणे दीर्घायुषी पण निष्क्रिय बनली. याच सुमारास पाश्चिमात्य देश कासवाचे गरुड बनले होते.
 गेली सुमारे दीड हजार वर्षे आपण स्वीकारलेल्या या कासव परंपरेमुळे समाजाची काही अंगभूत वैशिष्ट्ये बनली आहेत. ती जुन्या काळात कदाचित सोयीची असतील,पण सध्याच्या उद्योगप्रधान व अर्थप्रधान काळात जाचक नव्हे तर घातक ठरत आहेत.हे दोष पुढीलप्रमाणे-
 १.कामांची जातीनिहाय विभागणी व एका जातीचं काम दुसच्या जातीने करायचं नाही हा सर्वमान्य नियम.
 २.पूर्वजांनी घालून दिलेले नियम व पध्दती जशाच्या तशा पाळणंं. त्याचं पुनर्मूल्यांकन न करणं.म्हणजेच ज्ञानापेक्षा व्यक्तीला महत्व.
 ३.संशोधन करून नवं तंत्रज्ञान, बाजार पध्दती शोधण्यापेक्षा आहे ते राखणंं व धोका न पत्करता सुरक्षित जगण्याकडे कल.
 ४.पारंपरिक ज्ञान हेच श्रेष्ठ असून त्यानुसारच व्यवहार चालला पाहिजे हा दंडक. परिवर्तन किंवा बदलाला कोणत्याही क्षेत्रात वाव नाही.
 १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात पाश्चिमात्य पध्दतीच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. पण समाज मनावर या चारीही वैशिष्ट्यपूर्ण दोषांचा प्रभाव इतका होता की,उद्योगक्षेत्रातही त्यांचा शिरकाव झाला. समाजाच्या विविध घटकांची मानसिकता आहे तशीच राहिली.प्रगत विज्ञानाच्याआधारावर उभारल्या गेलेल्या उद्योगांमध्ये कामाच्या विभागणीत जातिव्यवस्थेचे दर्शन घडू लागले. मालकी व उच्च व्यवस्थापकीय पदंं ब्राह्मणांच्या हातात, निम्न स्तरावरील व्यवस्थापकीय पदं मधल्या जातींंच्या हातात, तर कारकुनी स्वरूपाची कामे निम्न मध्यमवर्गीयांकडे तर कष्टाची व 'खालच्या दर्जाची’समजली जाणारी कामे खालच्या जातींकडे अशा प्रकारे कामांची विभागणी होऊ लागली.कोणताही उद्योग चालवायचा असेल तर तो गरुडाच्या पध्दतीनेच चालवावा लागतो. कासवनीती तेथे उपयोगी पडत नाही. तथापि, शतकानुशतके अंगवळणी पडलेली व्यवस्था अचानक काही वर्षांत बदलणंंही अवघड असतंं. स्वातंत्र्यानंतरही उद्योगशेत्राला या वैशिष्ट्यपूर्ण समाजरचनेचा जाच जाणवतो आहेच.

 याखेरीज नव्या तंत्रज्ञानाचं संशोधन व स्वीकार याबाबत कामगार वर्ग आणि व्यवस्थापन यांची उदासीनता, संस्थेमध्ये कामापेक्षा गटबाजी, व्यक्तिगत हेवेदावे,

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/८१