पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
प्रेरणा : कर्मचाऱ्याला कामासाठी प्रवृत्त करण्याचा पारंपरिक मार्ग म्हणजे भीती घालणं. ‘हे काम संध्याकाळच्या आत पूर्ण झालंं पाहिजे. नाहा तर तू उद्या कामावर येण्याची गरज नाही,’ अशी भीती घातली की ते काम होण्याची शक्यता बरीच असते. तथापि,एक समस्या असते. ‘आज संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणं शक्य नाही. तरीही मी उद्या कामावर येणार आहे.कोण करतं हे पाहू'असं उत्तर जर कर्मचाऱ्यांनं दिलं, तर व्यवस्थापकाची पंचाईत होते.
बदलत्या काळानुसार या भीतीच्या मात्रेचा परिणाम कमी होत चालला आहे केवळ कार्यालयातच नाही तर घरातही. माझ्या लहानपणी आम्ही सहा मुलं घरात होतो. आई सकाळी सात वाजता सहा कपात दूध ओतून ठेवायची आणि हुकूम करायची जो दूध तीन मिनिटांत संपवणार नाही, त्याला मार मिळेल. सर्व कप दोन मिनिटांत रिकामे व्हायचे.
आता घरात एक किंवा दोनच मुलं असतात. आई विचारते, ‘सनी, बाळा अरे दूध घेतलंस का?' बाळ उत्तरतो, ‘नो मॉम, आज मी दूध पिणार नाही.’ मग वाटाघाटी सुरू होतात. ‘बोर्नव्हिटा घालू? मग पिशील? नको, अरे मग हॉर्लिक्स हवं का? तू शहाणा मुलगा ना? मग असं नाई करायचं. दूध प्यालास तर संध्याकाळी ना तुझ्यासाठी मी कॅडबरीज आणणारय.’ वगैैरे. नोकरीच्या ठिकाणी अशी आणि इतकी आर्जवं केली जात नसली, तरी भीतीचा परिणाम होत नाही, तर दुसरं मोटिव्हेशन म्हणजे आमिष, पण त्यालाही मर्यादा आहेत. कारण संस्थेजवळ तितका पैसा उपलब्ध हवा. शिवाय आमिषं घेऊन काम करायची सवय लागली, तर दिवसेंदिवस मागणी वाढतच जाते. सुटीच्या दिवशी किंवा अधिक तास काम करावं लागलं तर दुप्पट ओव्हरटाईम देण्याचा प्रघात पूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये होता. त्याचा फायदा घेण्यासाठी कर्मचारी कामाच्या नियमित तासांमध्ये स्वस्थ बसून तसेच काम ओव्हरटाईममध्ये करू लागले(आम के आम गुठलियों के भी दाम) अखेर ही पध्दत बंद करावी लागली.
म्हणजेच भीती किंवा आमिष या मार्गाने मानव व्यवस्थापन करणं अयोग्य असल्याचं आता स्पष्ट होत आहे. काळ जसा पुढं जाईल तशी ही व्यवस्थापन पध्दती मागं पडत जाणार आहे.भविष्यकाळात कर्मचाऱ्यांला प्रेरणा देण्यासाठी त्याच्या मनात तीन भावना निर्माण करण्याचे कार्य करावं लागणार आहे. एक, समरसता (सेन्स ऑफआयडेंटिटी), दोन, जबाबदारी (सेन्स ऑफ इम्पॉर्टन्स) आणि तीन, स्वयंविकास (सेन्सऑफ डेव्हलपमेंट).
पुढील लेखात विविध उदाहरणांच्या मदतीनं या तिन्ही भावनांबद्दल जाणून घेऊ.