पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असणाऱ्या कोकणी नागरिकांनी यापूर्वीच मुंबईत स्थलांतर केलं आहे!
 `ठाण्यात सेल्समनच्या जागेसाठी बिगर महाराष्ट्रीयन उमेदवार हवे आहेत’ अशी जाहिरात एका कंपनीनं नुकतीच दिली. त्यामुळे ठाण्यातील एका स्थानिक दादाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं कंपनीत जाऊन जाब विचारला. ‘महाराष्ट्रीय लोक आळशी असतात असा आमचा अनुभव आहे,' असं तिथल्या रिसेप्शनिस्टनं त्याला सांगितलं. अशी जाहिरात चुकीचीच आहे, यात वाद नाही. पण त्यावरून धडाही शिकण्यासारखा आहे. बाहेरून आलेले लोक काबाडकष्ट करतात. पैसा मिळवितात आणि आर्थिक प्रगतीच्या शिड्या चढून वर जातात. स्थानिक लोक मात्र त्यांचा निषेध करीत जागच्या जागेवरच राहतात. दुसरऱ्या गावी बदली होते म्हणून प्रमोशन नाकारलेले स्थानिकही मला माहीत आहेत.
 स्थानिकांना ‘कासव संस्कृती’ पसंत असते, तर 'बाहेरच्यां'चं नातं 'गरुड संस्कृती'शी असतं. कासवाचं नैसर्गिक आयुष्य २०० वर्षांचं असतं. पण ते पूर्ण करण्याआधीच त्यातली कित्येक भुकेनं मरतात. कारण एक मैल परिसरात जाऊन अन्न मिळालं नाही तर ती उपाशी राहणे पसंत करतात, पण हद्द ओलांडून जात नाहीत. याउलट गरुडाची कितीही दूर उडत जाऊन शिकार साधण्याची तयारी असते.

 स्थलांतरितांमुळे समस्या निर्माण होतात हे खरं. गुन्हे वाढतात. सांस्कृतिक संघर्ष निर्माण होतात. जुन्या संस्कृतीसमोर, अस्तित्वाचा धोका उभा राहतो, पण असं होणं अपरिहार्य आहे. कारण सतत बदलत राहणं हा संस्कृतीचा स्वभावधर्म आहे. स्थलांतरित याच स्वभावधर्माला खतपाणी घालतात इतकंच.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/२२३