पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 घुसखोरीचं तसं नसतं. तिचा उद्देश देवाण-घेवाणीचा नसून लूटमार करण्याचा असतो.हिंसाचार माजवणं, स्थानिकांना घाबरवणं आणि त्यांची संपती हरण करणं, प्रदेश बळकावणं यासाठी घुसखोरी केली जाते. काश्मीरमध्ये पाकिस्तानातून होणारं दहशतवाद्यांचं स्थलांतर ही घुसखोरी आहे. पण महानगरांमध्ये देशाच्या गरीब भागांतून होणारं स्थलांतर ही घुसखोरी म्हणता येणार नाही.
 स्थलांतराचे फायदे-तोटे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. अमेरिका हा देश सर्वाधिक स्थलांतर होणारा देश आहे. जगाच्या सर्व भागांमधून गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित पुरुष-महिला संधी मिळेल तेव्हा अमेरिकेकडं धाव घेताना दिसतात. आता तर परिस्थिती अशी आहे की, तो स्थलांतरितांचाच देश बनला आहे. पिढ्यान् पिढ्या तिथं राहणारे एतद्देशीय आता अल्पसंख्य झालेत आणि ‘बाहेरून' आलेले बहुसंख्य बनले आहेत.
 पण याच स्थलांतरितांनी गेल्या १०० वर्षांत अमेरिकेला जगातील सर्वात मोठी औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक महाशक्ती बनविली आहे. १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अवजड उद्योगांपासून ते २५ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या अत्याधुनिक संगणक सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या उद्योगांपर्यंत सर्व क्षेत्रात स्थलांतरितांचाच बोलबाला झाला आहे. केवळ विज्ञान, तंत्रज्ञान, सेवा, अर्थ या क्षेत्रांतच नाही तर कला, संगीत, क्रीडा इत्यादी सांस्कृतिक क्षेत्रांतही स्थलांतरितांचे योगदान लक्षणीय आहे. ऑलिम्पिकची सुवर्णपदकं असोत वा नोबेल पारितोषिकं, ती मिळवून स्थलांतरित अमेरिकेच्या प्रतिष्ठेत भर घालत असतात.
 आपल्या मुंबईचंही असंच नाही का? ‘१०० वर्षांपूर्वीपासूनच आमचे पूर्वज इथं राहत आहेत,’ असं सांगणारे फार थोडे लोक मुंबईत सापडतील. विशेषतः दुसरं महायुध्द आणि भारताच्या फाळणीनंतर मुंबईत देशाच्या सर्व भागांतून स्थलांतरितांचे लोंढे आले. त्यांनी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनविलं.
 १९५० च्या आसपास मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात होती. त्यावेळी गुजराथी समाजाविरुध्द वातावरण बरंच तापलं होतं. कालांतरानं ते निवलं. गुजराथ्यांनी जितके रोजगार बळकावले असतील त्याहीपेक्षा जास्त रोजगार निर्माणही झाले आहेत आणि त्यांचा स्थानिक जनतेला फायदाही झाला आहे हे नाकारून चालणार नाही. आजही मुंबईत शहरात गुजराथ्यांपेक्षा मराठी लोकांची संख्या अधिक आहे. तरी, मराठी लोकांनी जितके उद्योग आणि रोजगार निर्माण केले त्याच्या काही पट अधिक उद्योग व रोजगार गुजराथ्यांनी निर्माण केले हे सत्य आहे.

 अमेरिकेतल्या भारतीयांची कथाही अशीच आहे. प्रारंभी नोकरी मिळविण्यासाठी

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२२१