एक म्हण आहे. तिचा उपयोग विवाद मिटविण्यासाठी करणं आवश्यक आहे. म्हणजेच व्यवस्थापकीय कामकाज कसं चालतं, अडचणी कोणत्या असतात आणि अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी कोणत्या कसरती कराव्या लागतात याची माहिती कर्मचाऱ्यांना करून देणं गरजेचं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या समस्यांची व्यवस्थापनाला प्रत्यक्ष ओळख होणं महत्वाचं आहे. थोडक्यात कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांच्या आणि व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या 'वंशा'ला पाठविणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी संस्थेची सत्य परिस्थिती त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. मात्र, ती सांगताना लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या गोष्टींप्रमाणं सांगावयास हवी. सत्य तर समजलं पाहिजे, मात्र त्याचा सकारात्मक परिणाम झाला पाहिजे. नकारात्मक भावना निर्माण होता कामा नये. तशी झाल्यास व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खचू शकतं.
सत्य समजल्याने गैरसमज दूर होतात. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते. संस्था हेच आपलं जीवन आहे. ती टिकली पाहिजे. वाढली पाहिजे, हे ध्येय दोन्ही बाजूंमध्ये निर्माण झालं पाहिजे. कंपनीच्या मूल्यवृध्दीमध्ये व्यवस्थापनाचं योगदान किती, कर्मचाऱ्यांचं किती याची दोन्ही बाजूंना माहिती मिळाली की, कुणाच्या कोणत्या मागण्या न्याय्य आहेत आणि नाहीत याचा निर्णय सामोपचारानं घेणं अशक्य नाही. सध्याच्या स्पर्धेच्या युगात या सामंजस्याची आवश्यकता कधी नव्हे इतकी निर्माण झाली आहे. संस्थेच्या अंतर्गत कामकाजापासून ते तयार होणाऱ्या उत्पादनांपर्यंत सर्वांची गुणवत्ता या सामंजस्यावर अवलंबून आहे. यात कुठेही कमी पडल्यास शर्यतीत मागं पडण्याची भीती असते.
हा सुसंवाद प्रशिक्षण आणि कार्यशाळांमधून निर्माण होतो. मात्र हे एका दिवसात साध्य होत नाही. किर्लोस्कर कमिन्समध्ये सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यास तीन वर्षे लागली. अर्थात ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मात्र ती नेटानं सुरू ठेवणं जरुरीचं आहे हे लक्षात घ्यावयास हवं.