पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापकापेक्षा आपले परिश्रम जास्त असूनही पगार त्यांना जास्त हे रागाचं मूळ कारण असू शकतं. पण या रागाला 'आवाज' देण्यासाठी नेत्यांची आवश्यकता असते. त्यामुळं नेत्यांची कास धरल्याशिवाय त्यांच्याशिवाय गत्यंतर नसतं. शिवाय, कर्मचाऱ्यांचा राग व्यक्तिश: एखाद्या व्यवस्थापकावर सहसा नसतो. प्रत्येक कर्मचारी प्रत्येक व्यवस्थापकाच्या विरुध्द आहे असं कधीच नसतं. मात्र, व्यवस्थापक या गटविशेषाच्या ते विरोधात असतात.

 दुसऱ्या बाजूला व्यवस्थापनाचेही कर्मचाऱ्यांबाबत गैरसमज असतात. कर्मचारी सांगकामे आहेत, त्यांना संस्थेच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही, ते फक्त पगारासाठी काम करतात. काहीही नवं शिकण्यांची त्यांची तयारी नसते, परिस्थिती समजावून घेण्याची त्यांची तयारी नसते. कामगार संघटना अडेलतट्टू असतात अशा अनेक भावभावना व्यवस्थापनानं बाळगलेल्या असतात. सत्य हे या दोन्ही बाजूंच्या मध्ये कुठेतरी असतं.

 व्यवस्थापन आणि कामगार नेते यांचं साप-मुंगसाचं नातं जगप्रसिध्द आहे. प्रत्येकदा कामगार नेते व्यवस्थापनाच्या दृष्टीनं अडचणीचे ठरतात. त्यामुळं ते व्यवस्थापनाला नकोसे वाटतात. प्रथम अधिकाधिक फायदा मिळविणं आणि नंतर कृत्रिम मंदी निर्माण करून कामगारांचे पगार कमी करणं, त्यांना अधिकाधिक गरीब बनवणं हेच भांडवलशहांचं ध्येय असतं असं कार्ल मार्क्सनं म्हटलं आहे. त्याच्या काळात खरोखरच तशी स्थिती होती. अनेक उदाहरणंही त्यानं दिलेली आहेत. कामगार नेत्यांची व्यवस्थापनाबाबत भावना अशीच असते. मार्क्सनं सांगितल्याप्रमाणं आजही असं घडतंय पण त्याचं प्रमाण बरंच कमी आहे.

 व्यवस्थापन - कर्मचारी सुसंवाद आब अधिक प्रमाणात आहे. संघर्षापेक्षा तडजोडीतच दोन्ही बाजूंचा अधिक फायदा असतो हे त्यांना पटतं आहे. तरीही संघर्ष, वैचारिक मतभेद आणि विवाद उद्भवतच असतात. त्यांचं सुयोग्य व्यवस्थापन करणं हे संबंधितांसमोर आव्हान आहे.

 व्यवस्थापकांसाठी मी एक कार्यशाळा घेत असताना कर्मचारी संघटनांचा विषय निघाला, 'कर्मचारी व त्यांच्या संघटनांना वठणीवर आणावयाचं असेल तर आणीबाणी हाच एक उपाय आहे. कार्यशाळा घेऊन काही उपयोग होणार नाही. आणीबाणीच्या काळात कोणत्याही कार्यशाळेशिवाय उत्पादन दुप्पट करून दाखविलं होतं. कारण कामगार संघटनांवर बंदी होती. आताही अशी बंदी घालणं आवश्यक आहे' अशी टोकाची भूमिका अनेक व्यवस्थापकांनी घेतली होती.

 या संघर्षावर उपाय काय? आपल्याकडे 'जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे' अशी

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/ १९५