पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन संघर्षाचे

रातन काळी एक राजा होता. त्याच्या दरबारात एक विख्यात ज्योतिषी आला. राजानं साहजिकच भविष्य विचारलं. कुंडली वगैरे पाहून ज्योतिषाने गंभीरपणे सांगितलं, 'महाराज आपल्या सर्व आप्तस्वकियांचा मृत्यू पाहणं आपल्या ललाटी लिहिलं आहे.' ही भविष्यवाणी ऐकताच राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं ज्योतिषाला कारागृहात डांबण्याची आज्ञा केली.

 काही दिवसांनंतर आणखी एक ज्योतिषी दरबारात आला. त्यालाही राजाने भविष्य विचारलं. राजाचा हात पाहून तो म्हणाला, 'राजन, आपल्या सर्व आप्तस्वकियांपेक्षा आपल्याला आयुष्य जास्त आहे.' राजा खुश झाला. तबकभर सुवर्णमुद्रा झोळीत घालून त्यानं त्याचा आदरसत्कार केला.

 वास्तविक दोन्ही ज्योतिषांनी एकच भविष्य वर्तवलं होतं. पण ते सादर करण्याची पध्दत भिन्न होती. परिणाम त्यानुरूपच झाला.

 कोणत्याही संस्थेत अनेक संघर्ष निर्माण होत असतात. त्यापैकी व्यवस्थापन - कर्मचारी संघर्ष हा सर्वात गंभीर असतो. त्याचं योग्य व्यवस्थापन करणं कौशल्याचं काम आहे आणि ते करताना वरील गोष्ट आदर्श ठरावी अशी आहे.

 तर संघर्ष व्यवस्थापनापूर्वी संघर्षाचं स्वरूप थोडक्यात समजावून घेणं आवश्यक आहे. कर्मचारी, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे नेते हे संघर्षाचे तीन पैलू असतात. प्रत्येक पैलू आपण अधिकाधिक चमकदार कसे दिसू यापेक्षा दुसऱ्या पैलूची चमक कमी कशी करता येईल याकरिता प्रयत्न करतो. याचा परिणाम म्हणून सगळी संस्था काळवंडते.

 कर्मचारी आणि त्यांचे नेते एकत्रितपणे व्यवस्थापनाला विरोध करतात आणि त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असा सार्वत्रिक समज आहे. मात्र तो तितकासा खरा नाही. कर्मचाऱ्यांना आपले नेते आवडतातच असं नाही. कित्येकदा नेत्यांबाबत ते नाराजच असतात असा अनुभव आहे. मात्र व्यवस्थापनावर त्यांचा राग अधिक असतो.

व्यवस्थापन आणि सेवाभाव/१९४